
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
वाद आणि नाट्यमय घडामोडींसाठी चर्चेत असलेला ‘लॉक अप 2’ हा रिअॅलिटी शो पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे. शोच्या ताज्या भागातील ‘व्हिजिटर्स डे’ एपिसोडमध्ये स्पर्धकांची त्यांच्या कुटुंबीयांशी भेट झाली. या भावनिक वातावरणात धीरज धूपर पत्नी विन्नी अरोराला भेटून भावूक झाला, तर दुसरीकडे आकांक्षा चमोलाच्या एका वक्तव्यामुळे सोशल मीडियावर मोठा वाद निर्माण झाला आहे.
विन्नी अरोरा निघून गेल्यानंतर श्रेया कालरा, शिल्पा शिंदे आणि आकांक्षा चमोला गप्पा मारत होत्या. यावेळी श्रेयाने तिचा प्रियकर तिला भेटायला यावा, अशी इच्छा व्यक्त केली. त्यावर आकांक्षाने एक्स पती आणि लोकप्रिय टीव्ही अभिनेता गौरव खन्ना चा उल्लेख करत त्याला”एक अनोळखी व्यक्ती” आणि “माझा एक्स” असे संबोधले.
आकांक्षा म्हणाली की, तिचे कुटुंबीय भेटायला आले नाहीत आणि तिला अशा कठीण काळात आई-वडिलांच्या आधाराची गरज होती. पुढे ती म्हणाली, “माझ्या घरातलं कोणीतरी आलं असतं तर बरं झालं असतं. ही भेट माझ्यापेक्षा गौरवसाठी जास्त होती. माझे आई-वडील आले असते तर मला जास्त आनंद झाला असता… किंवा माझ्याऐवजी माझा कुत्रा जरी आला असता तरी.”
आकांक्षाच्या या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच नेटकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. काहींनी तिच्या मानसिक तणावाचा दाखला देत तिची बाजू घेतली असली, तरी बहुसंख्य सोशल मीडिया वापरकर्त्यांनी तिच्या वक्तव्यावर संताप व्यक्त केला आहे. अनेकांनी कमेंट करत “तू गौरव खन्नासारख्या व्यक्तीच्या लायकीची नाहीस,” अशी टीका केली, तर काहींनी हे केवळ प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न असल्याचे म्हटले.
विशेष म्हणजे, ‘लॉक अप 2’ सुरू झाल्यानंतर आकांक्षा चमोलाने ती आणि गौरव खन्ना कायदेशीररित्या घटस्फोट घेत असल्याची माहिती दिली होती. मात्र, विभक्त झाल्यानंतरही दोघांमध्ये परस्पर आदर आणि पाठिंबा कायम राहील, असा दावा तिने केला होता. आता मात्र ‘व्हिजिटर्स डे’मधील या वक्तव्यानंतर तिच्या त्या दाव्यावर सोशल मीडियावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.