
( फोटो सौजन्य- सोशल मिडिया)
Prasad Oak:अभिनेता प्रसाद ओक आपल्या दमदार अभिनयासाठी ओळखला जातो. ‘धर्मवीर’ या चित्रपटात त्याने शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांची भूमिका साकारली होती. २०२२ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटातील त्याच्या भूमिकेला प्रेक्षकांकडून मोठी पसंती मिळाली. आनंद दिघे यांच्यासारखी केलेली वेशभूषा, देहबोली, संवादफेक आणि अभिनय यामुळे प्रसाद ओकने प्रेक्षकांच्या मनावर वेगळी छाप पाडली.
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत प्रसाद ओकने ‘धर्मवीर’च्या आठवणींना उजाळा देताना उद्धव ठाकरे यांच्याशी संबंधित एक खास किस्सा सांगितला आहे.
‘एबीपी माझा’ला दिलेल्या मुलाखतीत प्रसाद ओकला ‘धर्मवीर’ चित्रपटातील आनंद दिघे यांच्या भूमिकेमुळे राजकीयदृष्ट्या काही अडचणींचा सामना करावा लागला का, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर प्रसादने स्पष्टपणे आपली भूमिका मांडली.
“मी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोघांच्या खूप जवळचा व्यक्ती आहे. मला कुणीच प्रश्न विचारला नाही की तू ही भूमिका का करतोय? मला अजिबातच भीती वाटली नाही. भीती वाटली असती तर मी कलाकार झालोच नसतो,” असं प्रसाद ओकने सांगितलं.
कलाकार म्हणून प्रत्येकजण चांगल्या भूमिकेच्या आणि संधीच्या प्रतीक्षेत असतो, असं प्रसादने सांगितलं. तो म्हणाला, “प्रत्येक कलाकार चांगल्या भूमिकेची, संधीची वाट पाहत असतो. मी जवळपास ९५ चित्रपट केले, तरीसुद्धा मी अशा संधीची वाट पाहत होतो.”
‘धर्मवीर’ हा त्याच्या कारकिर्दीतील ९६ वा चित्रपट होता आणि या भूमिकेसाठी त्याने सर्वस्व झोकून दिलं होतं.
दरम्यान, चित्रपट पाहिल्यानंतरचा एक खास प्रसंग सांगताना प्रसाद ओकने उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्या प्रतिक्रियेबद्दलही भाष्य केलं.
प्रसाद म्हणाला, “चित्रपट पाहिल्यानंतर संजय राऊत यांनी माझं खूप कौतुक केलं. ‘धर्मवीर’ पाहिल्यानंतर तर जोपर्यंत प्रसाद ओक येत नाही, तोपर्यंत मी मीडियाला प्रतिक्रिया देणार नाही, असं सांगून उद्धव ठाकरे रस्त्यावरच उभे राहिले.”
पुढे हा प्रसंग आठवताना प्रसाद म्हणाला, “त्यावेळी मला गर्दीतून खाली आणलं गेलं. उद्धव ठाकरे माझ्यासाठी असे थांबले आहेत, हे समजल्यावर मला थोडं संकोचल्यासारखंच झालं.”
उद्धव ठाकरे यांनी त्यावेळी प्रसाद ओकचं कौतुक करताना नेमकं काय म्हटलं, हेही अभिनेत्याने सांगितलं.
“ते मला म्हणाले की, ‘तू आल्याशिवाय मला तुझं कौतुक करायचं नव्हतं.’” उद्धव ठाकरे यांच्या या प्रतिक्रियेची आठवण प्रसाद ओकने मुलाखतीत सांगितली.
या भूमिकेमुळे राजकीयदृष्ट्या आपल्याला कोणताही त्रास झाला नसल्याचंही प्रसादने स्पष्ट केलं. “त्यामुळे राजकीयदृष्ट्या मला कोणाचाही त्रास झाला नाही,” असं त्याने सांगितलं.
‘धर्मवीर’मधील आनंद दिघे यांच्या भूमिकेला मिळालेलं प्रेम आणि या भूमिकेनंतर उद्धव ठाकरे यांनी केलेलं कौतुक हा प्रसाद ओकच्या कारकिर्दीतील महत्त्वाचा अनुभव ठरला आहे.