
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
कलर्स मराठीवरील लोकप्रिय मालिका जय जय स्वामी समर्थ मालिकेच्या येत्या भागात श्रद्धा, अहंकार आणि कलेची मोठी परीक्षा पाहायला मिळणार आहे. श्रद्धेच्या शक्तीसमोर स्वार्थाचे आव्हान उभे राहणार आहे. योग्य व्यक्तीला त्याच्या कलेचे खरे श्रेय मिळावे, यासाठी स्वामी काय करणार? हे विशेष भागात उलगडेल.
राजदरबारातील नवरत्नांपैकी गोवर्धन हा एक प्रसिद्ध चित्रकार आहे. पण वय वाढल्यामुळे आणि आजारपणामुळे त्याचे हात थरथरू लागले आहेत. त्यामुळे त्याची चित्रकला पूर्वीसारखी राहिलेली नाही. राजाकडून त्याला वारंवार टीका सहन करावी लागते आणि त्याचे पद कधीही जाऊ शकते अशी परिस्थिती आहे.
गोवर्धनची इच्छा आहे की त्याचा मुलगा मुकुंद याने त्याची जागा घ्यावी आणि चित्रकलेचा वारसा पुढे न्यावा. मात्र मुकुंदमध्ये ती कला आणि जादू नाही. स्वामी स्पष्ट सांगतात की मुकुंद हा त्याच्या कलेचा योग्य वारसदार नाही.
स्वामींनी मुकुंद हा कलेचा योग्य वारसदार नाही असे स्पष्ट सांगितल्यावर तो संतापतो. “रक्तातून गुण येतातच. मी बाबांइतकाच चांगला चित्रकार आहे,” असे म्हणत तो स्वतःला सिद्ध करण्याचा निर्धार करतो आणि स्वामींनाच आव्हान देतो.
दरम्यान, राजदरबारातून गोवर्धनला मोठा आदेश येतो. होळीपूर्वी राजेसाहेबांना स्वामींचे तैलचित्र भेट द्यायचे असते आणि ते चित्र गोवर्धनने तयार करायचे असते. यासाठी मोठा मोबदला जाहीर केला जातो. आजारपणामुळे खचलेला गोवर्धन हा प्रस्ताव नाकारण्याचा विचार करतो. मात्र पैशाच्या मोहात पडून मुकुंद हे चित्र स्वतः काढण्याची जबाबदारी घेतो.
याच वेळी अंबिका नावाची तरुणी, जी आर्थिक अडचणीत आहे पण उत्तम कलाकार आहे, स्वामींच्या भक्तीने प्रेरित होऊन त्यांचे सुंदर चित्र रेखाटते. तिच्या चित्रात दिव्य तेज दिसून येते. मुकुंदला हे कळताच तो तिला पैशाचे आमिष दाखवून ते चित्र विकत घेतो आणि स्वतःच्या नावाने राजदरबारात सादर करतो.
मुकुंद आणि सरस्वतीचा एक निर्णय आणि अंबिकेची एक तडजोड या सगळ्याचा परिणाम काय होणार? कला की व्यापार? श्रद्धा की गरज? होळीच्या निमित्ताने स्वामी सांगतात, “या वेळी केवळ होळी पेटणार नाही… काही अहंकार, काही गैरसमज, काही भ्रमही जळून खाक होतील.” राजेसाहेबांच्या उपस्थितीत स्वामींना चित्र अर्पण होणार आहे. पण त्या चित्रामागचं सत्य काय आहे? ते सत्य उघड झालं तर कोणाची प्रतिष्ठा राखली जाईल आणि कोणाचा मुखवटा गळून पडेल?
एका बाजूला अंबिकेची निष्कलंक भक्ती, दुसऱ्या बाजूला मुकुंदचा महत्त्वाकांक्षी अहंकार आणि मधोमध स्वामींचं शांत, अर्थपूर्ण स्मित… या होळीमध्ये जळणार काय आणि उजळणार काय याची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. आता स्वामी योग्य व्यक्तीला न्याय आणि श्रेय कसे मिळवून देणार, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
Anupam Kher यांना भावला ‘Subedar’चा ट्रेलर; Anil Kapoor यांच्या कामाचे कौतुक करत म्हणाले…