
फोटो सौजन्य- pinterest
मुंबईतील चेंबूर येथे वसलेला श्री स्वामी समर्थ मठ हा संपूर्ण स्वामी संप्रदायातील अत्यंत पवित्र, जागृत आणि प्रासादिक मठ म्हणून ओळखला जातो. या मठाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे येथे प्रत्यक्ष अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराजांनी प्रसाद म्हणून आपल्या परमशिष्य व मानसपुत्र श्री स्वामीसुत महाराजांना प्रदान केलेल्या ‘आत्मलिंग पादुका’ विराजमान आहेत. या पादुकांमध्ये स्वामींचे चैतन्य आजही अनुभवल्याचा अनुभव असंख्य भक्त सांगतात.
सन २०१७ मध्ये या मठाने शताब्दी वर्ष पूर्ण केले. शंभर वर्षांहून अधिक काळ हा मठ स्वामीभक्ती, नामस्मरण, सेवा आणि अध्यात्माचा दीप अखंड प्रज्वलित ठेवत आहे. दररोज होणारी पूजा, आरती, नामजप, पारायण, भजन, प्रवचने आणि विविध धार्मिक उपक्रम यांमुळे या ठिकाणी एक विलक्षण सात्त्विक वातावरण अनुभवायला मिळते.
चेंबूरचा हा मठ केवळ मंदिर नाही, तर स्वामीभक्तांसाठी श्रद्धा, विश्वास आणि आत्मानुभूतीचे केंद्र आहे. येथे वर्षभर विविध धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. सामुदायिक नामस्मरण, अखंड नामजप, श्रीगुरुचरित्र पारायण, दत्तजयंती, गुरुपौर्णिमा, स्वामी प्रकटदिन आणि श्री स्वामी समर्थ जयंती यांसारखे उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरे केले जातात.
विशेषत म्हणजे श्री स्वामी समर्थ जयंती हा उत्सव सलग तीन दिवस अत्यंत उत्साहात साजरा केला जातो. हजारो स्वामीभक्त या काळात मठात दर्शनासाठी येतात. पालखी सोहळा, भजन, कीर्तन, महाप्रसाद, नामस्मरण आणि धार्मिक प्रवचनांनी संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघतो.
श्री हरिभाऊ तावडे हे पुढे संपूर्ण स्वामी संप्रदायात श्री स्वामीसुत महाराज म्हणून प्रसिद्ध झाले. अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज त्यांना अत्यंत प्रेमाने “माझा सुत” म्हणजेच “माझा पुत्र” असे संबोधत असत.
हरिभाऊ हे व्यापारी होते. त्यांचे मित्र गजानन खत्री यांच्यासह व्यापारात त्यांना मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागला. त्यांचे स्नेही लक्ष्मण पंडित यांनी मैत्रीखातर त्यांची हमी घेतली होती. त्यामुळे पंडित स्वतःही मोठ्या कर्जाच्या ओझ्याखाली दबले. अत्यंत निराश अवस्थेत त्यांनी अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थांचा नवस केला. काही दिवसांतच एका जुन्या व्यवहारातून त्यांना अनपेक्षितपणे मोठी रक्कम प्राप्त झाली. त्या पैशातून त्यांनी सर्व कर्जाची परतफेड केली. या अद्भुत घटनेमुळे सर्वांच्या मनात श्री स्वामी समर्थांविषयी अढळ श्रद्धा निर्माण झाली. त्यानंतर हरिभाऊ, गजानन खत्री आणि लक्ष्मण पंडित हे तिघे अक्कलकोटला श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी गेले.
“तू माझा सुत हो!” – स्वामी
प्रथम दर्शनातच श्री स्वामी समर्थांनी हरिभाऊंकडे पाहून अत्यंत प्रेमाने सांगितले, “तू कुळावर पाणी सोड आणि माझा सुत हो!”
स्वामींच्या या वचनाने हरिभाऊंच्या जीवनाला नवे वळण मिळाले. संसार, धन, वैभव यापेक्षा गुरूसेवा आणि अध्यात्म हाच जीवनाचा खरा मार्ग आहे, याची त्यांना जाणीव झाली. व्यवहारातून मिळालेल्या 300 रुपयांची रक्कम त्यांनी सोबत आणली होती. श्री स्वामी समर्थांनी त्या पैशांतून चांदीच्या पादुका तयार करून आणण्याची आज्ञा केली.
हरिभाऊंनी अत्यंत भक्तिभावाने चांदीच्या पादुका तयार करून स्वामींच्या चरणी अर्पण केल्या. श्री स्वामी समर्थांनी त्या पादुका सलग 14 दिवस स्वतः वापरल्या. त्या आपल्या चरणी धारण केल्या. त्या हात, पाय, मुख आणि शरीराला स्पर्श करून त्या पादुकांमध्ये स्वतःचे चैतन्य जागृत केले.
त्या काळात अनेक सेवेकऱ्यांची इच्छा होती की या पादुका प्रसाद म्हणून आपल्याला मिळाव्यात. परंतु श्री स्वामी समर्थांनी त्या कोणालाही न देता हरिभाऊंनाच प्रसाद म्हणून दिल्या.
पादुका देताना स्वामी समर्थ म्हणाले, “हे आत्मलिंग आहे. यामध्ये माझ्या आत्म्याचा निवास आहे.”
यामुळेच या पादुका पुढे ‘आत्मलिंग पादुका’ या नावाने संपूर्ण स्वामी संप्रदायात पूजनीय ठरल्या. आजही या पादुकांना श्री स्वामी समर्थांच्या साक्षात उपस्थितीचे प्रतीक मानले जाते.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: आत्मलिंग पादुका म्हणजे श्री स्वामी समर्थांनी स्वतः वापरून, आपल्या चरणांचा स्पर्श करून प्रसादस्वरूप दिलेल्या पवित्र पादुका. स्वामी संप्रदायात त्यांना अत्यंत पूजनीय मानले जाते.
Ans: श्री स्वामी समर्थांनी या पादुका आपल्या परमशिष्य आणि मानसपुत्र श्री स्वामीसुत महाराज (हरिभाऊ तावडे) यांना प्रसाद म्हणून दिल्या, अशी परंपरागत श्रद्धा आहे.
Ans: मुंबईतील चेंबूरच्या श्री स्वामी समर्थ मठात या आत्मलिंग पादुका विराजमान आहेत. त्यामुळे हा मठ स्वामीभक्तांसाठी अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचे श्रद्धास्थान मानला जातो.