
( फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
कलर्स मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘जय जय स्वामी समर्थ’मध्ये यंदा गुरुपौर्णिमेनिमित्त प्रेक्षकांसाठी खास आध्यात्मिक पर्वणी सादर करण्यात येणार आहे. २ जुलैपासून संपूर्ण जुलै महिना ‘गुरुदर्शनाचा महिना’ म्हणून साजरा केला जाणार असून, या विशेष पर्वात स्वामी समर्थांच्या पाच दिव्य गुरुरूपांचे दर्शन घडणार आहे.
या विशेष कथानकात भक्तांना श्री दत्तात्रेय (माहूर), श्री नृसिंह सरस्वती (गाणगापूर), श्री साईबाबा (शिर्डी), श्री श्रीपाद श्रीवल्लभ (कुरवपूर) आणि अखेरीस अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ अशा पाच दिव्य गुरुरूपांचा साक्षात्कार अनुभवायला मिळणार आहे. प्रत्येक गुरुरूपासोबत मालिकेची कथा नव्या वळणावर पोहोचणार असून, श्रद्धा आणि भक्तीचा अनोखा संगम प्रेक्षकांना पाहायला मिळेल.
मालिकेच्या नव्या पर्वात कावेरी या स्वामींच्या निस्सीम भक्तेची कथा केंद्रस्थानी आहे. १८ वर्षांपूर्वी हिरावून घेतलेले तिचे हक्काचे नशीब परत मिळवून देण्यासाठी स्वामी तिला अक्कलकोटला येण्याचे संकेत देतात. मात्र, परिस्थिती आणि स्वार्थी लोकांच्या विळख्यात अडकलेल्या कावेरीसमोर अनेक संकटे उभी राहतात.
अक्कलकोटकडे सुरू झालेल्या या आध्यात्मिक प्रवासात कावेरीला प्रत्येक टप्प्यावर स्वामींच्या वेगवेगळ्या गुरुरूपांचे दर्शन होणार आहे. प्रत्येक दर्शनातून तिला गुरुमंत्राचे एकेक अक्षर प्राप्त होईल, जे तिच्या आयुष्याला नवी दिशा देणार आहे.
दरम्यान, कावेरीला दत्तक घेऊन वाढवणारी वंदना तिच्या मार्गात अनेक अडथळे निर्माण करणार आहे. श्रद्धा आणि अहंकार यांच्यातील संघर्ष, स्वार्थ आणि विश्वास यांची परीक्षा, तसेच गुरुपौर्णिमेच्या महासोहळ्यात होणारे स्वामींचे विश्वरूप दर्शन ही मालिकेची प्रमुख आकर्षणे असणार आहेत.
भक्ती, श्रद्धा आणि आध्यात्मिक अनुभवांनी परिपूर्ण हा विशेष प्रवास २ जुलैपासून दररोज रात्री ८.१० वाजता ‘कलर्स मराठी’वर प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे.