
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
जय जय स्वामी समर्थ या मालिकेत सध्या गोमतीच्या आयुष्यातील अत्यंत भावनिक आणि परिवर्तनकारी टप्पा उलगडताना दिसत आहे. स्वामींच्या कृपेने आणि त्यांच्या सूचक लीलांमधून गोमतीच्या आयुष्यात नव्या अध्यायाची चाहूल लागते. विधवा म्हणून आयुष्य संपल्याची भावना मनात बाळगणाऱ्या गोमतीला स्वामी विविध संकेत देत नव्याने जगण्याची प्रेरणा देतात. कधी रोपट्याला पाणी घालताना, तर कधी महादेवाच्या मंदिरात जलाभिषेक करताना प्रत्येक कृतीतून स्वामी तिच्या आयुष्यात पुन्हा प्रेम आणि सौभाग्य येणार असल्याचे संकेत देतात. हळूहळू तिचं शिव नावाच्या तरुणाशी नातं जुळणार असल्याचं स्पष्ट होत जातं आणि तिच्या आयुष्यात नव्या सुरुवातीची किरणं दिसू लागतात.
Ranjith: मल्याळम दिग्दर्शकला अटक; लैंगिक अत्याचाराच्या प्रयत्नाप्रकरणी पोलिसांनी घेतले ताब्यात
दुसरीकडे, गोमतीवर निखळ प्रेम करणारा शिव गावातील जुनाट आणि कठोर विचारसरणीसमोर उभा ठाकतो. स्वामी त्याला “संघर्षाशिवाय सिद्धी नाही” हा मोलाचा संदेश देतात. हा संघर्ष केवळ वैयक्तिक प्रेमासाठी नसून, एका स्त्रीला नव्याने जगण्याचा अधिकार मिळवून देण्यासाठी आहे. गोमतीचे सासरे सुभेदार यांच्या तीव्र विरोधाला न जुमानता शिव ठामपणे तिच्या पाठीशी उभा राहतो. सुभेदारांनी रचलेले अनेक डाव स्वामींच्या हस्तक्षेपामुळे फोल ठरतात आणि योग्य वेळी गोमतीचे रक्षण होते. मात्र, समाजाचा विरोध आणि परंपरांच्या नावाखाली उभं राहिलेलं मोठं संकट या नात्याला सतत आव्हान देत राहतं.
या सगळ्या घडामोडींमध्ये स्वामी एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न उपस्थित करतात. विधवेला पुन्हा जगण्याचा, आनंदी होण्याचा आणि पुनर्विवाहाचा अधिकार नाही का? या प्रश्नातून समाजातील कठोर वास्तव आणि बदलाची गरज अधोरेखित होते. अखेर, प्रचंड विरोध असूनही स्वामींच्या कृपेने आणि निसर्गाच्या संकेताने गोमतीच्या आयुष्यात पुनर्विवाहाचा शुभ क्षण येणार असल्याची चाहूल लागते. विशेष म्हणजे, या प्रसंगात निसर्ग स्वतःच तिच्या आयुष्यात हळद-कुंकवाचं सौभाग्य घेऊन येतो हा एक दिव्य आणि भावनिक चमत्कार ठरणार आहे.
आता प्रश्न असा हा बदल खरंच घडणार का? आणि समाजातील विरोधक त्याला थांबवू शकतील का? मालिकेमध्ये घडणाऱ्या घडामोडी पाहण्यासाठी ‘जय जय स्वामी समर्थ’ ही मालिका पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.