
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
Jay Jay Swami Samarth: कलर्स मराठीवरील ‘जय जय स्वामी समर्थ – अध्याय स्वामीसेवेच्या कृपाप्रसादाचा’ मालिकेत अक्कलकोटमधील संघर्ष आता निर्णायक वळणावर पोहोचला आहे. स्वामींनी शिवनाथ आणि राधाला थेट तीन दिवसांची मुदत दिली आहे. आपली पापं कबूल करा आणि केलेल्या चुका सुधारा, अन्यथा त्याचे परिणाम भोगावे लागतील, असा इशारा स्वामींनी दिला आहे.
शिवनाथ आणि राधाच्या हातात देण्यात आलेलं वाळूचं घड्याळ या उलटणाऱ्या वेळेचं प्रतीक ठरत असून, या अंतिम इशाऱ्यामुळे दोघांवर मानसिक दबाव वाढत आहे. आता या तीन दिवसांत ते आपल्या चुका मान्य करणार का, की शेवटपर्यंत सत्य लपवण्याचा प्रयत्न करणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
या तीन दिवसांच्या मुदतीआधीच अक्कलकोटमध्ये आणखी एक मोठं संकट उभं राहिलं आहे. रेणुका पुन्हा अक्कलकोटमध्ये परतल्याचं समजताच शिवनाथ हादरतो. तिच्या तोंडून स्वतःची आणि राधाची पापं, भूतकाळातील रहस्यं आणि अपराध सर्वांसमोर उघड होण्याची भीती त्याला सतावत आहे.
संतापाच्या भरात शिवनाथ रेणुकाचा जीव घेण्याचा प्रयत्न करतो. मात्र, प्रत्येक वेळी तिच्या रक्षणासाठी स्वामी त्याच्या मार्गात ठामपणे उभे राहतात. दुसरीकडे मार्तंडच्या प्रभावाखाली असलेला शिवनाथ आपली चूक मान्य करून सत्य कबूल करण्यास तयार नाही.
स्वामींसमोरही चार दिवसांचं आव्हान
एकीकडे स्वामींनी शिवनाथ-राधाला तीन दिवसांची मुदत दिली आहे, तर दुसरीकडे सुबेदारांनी स्वामींनाही चार दिवसांची मुदत दिली आहे. चार दिवसांत हे प्रकरण संपवा, अन्यथा कायद्यानुसार कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा सुबेदारांनी दिला आहे.
त्यामुळे अक्कलकोटमध्ये दोन काउंटडाऊन सुरू झाले आहेत. एका बाजूला शिवनाथ-राधावर स्वामींचा दबाव, तर दुसरीकडे स्वामींसमोर सुबेदारांनी उभं केलेलं आव्हान. त्यामुळे मालिकेतील तणाव आता शिगेला पोहोचला आहे.
रेणुका अक्कलकोटमध्ये परत कशी आली? तिच्या मनगटावर बांधलेल्या कापडामागे नेमकं काय रहस्य आहे? स्वामींनी दिलेल्या औषधी लेपामुळे तिच्या मानसिक अवस्थेत काय बदल होणार? तसेच सदाशिवला रेणुकाबद्दल इतकी अनाकलनीय ओढ का वाटते, याचाही उलगडा अद्याप झालेला नाही.
दुसरीकडे मार्तंडचा खरा डाव काय आहे आणि शिवनाथ त्याच्या प्रभावातून बाहेर पडणार का, याकडेही प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे. शिवनाथ-राधाला दिसणारी कवटी, वाळूचं घड्याळ आणि वाढत जाणारे भास हे स्वामींचे संकेत आहेत की त्यांच्या कर्मांचा परिणाम, हा प्रश्नही कायम आहे.
आता सर्वात मोठा प्रश्न म्हणजे स्वामींनी दिलेल्या तीन दिवसांच्या मुदतीत शिवनाथ आणि राधा सत्य कबूल करणार का? की सुबेदारांची चार दिवसांची मुदत संपण्यापूर्वीच अक्कलकोटमध्ये असा काही अनपेक्षित उलटफेर होणार, ज्यामुळे संपूर्ण परिस्थिती बदलून जाईल?
बाळ अखेर स्वामींकडे सोपवलं जाणार का, रेणुकाच्या भूतकाळाचं गूढ काय आहे आणि मार्तंडचा डाव कुठपर्यंत पोहोचला आहे, याची उत्तरं आगामी भागांत मिळणार आहेत.
पुढील भागांत या सर्व रहस्यांचा उलगडा होणार असून, अक्कलकोटमध्ये आता कोणता मोठा ट्विस्ट घडणार याची उत्सुकता वाढली आहे.