
( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
हिंदी मालिकांमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण करून मराठी टेलिव्हिजन आणि ओटीटी विश्वात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री अक्षया नाईक सध्या एका खास वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे. ‘सुंदरा मनामध्ये भरली’ या लोकप्रिय मालिकेपासून ते नेटफ्लिक्सवरील गाजलेल्या ‘तस्करी’ वेब सीरिजपर्यंत विविध भूमिका साकारत तिने प्रेक्षकांची मनं जिंकली. मात्र, यावेळी ती तिच्या अभिनयामुळे नव्हे, तर कलाकारांच्या करिअरमधील वास्तव मांडल्यामुळे चर्चेत आहे.
सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये अक्षयाने स्पष्ट शब्दांत सांगितले की, “मला काम मागायला लाज वाटत नाही.” अभिनय क्षेत्र जितके आकर्षक दिसते, तितकेच ते अनिश्चित असल्याचे तिने म्हटले आहे.
अक्षया म्हणाली, “अभिनय हे करिअर जितकं ग्लॅमरस आहे, तितकंच अनसर्टनही आहे. प्रायोगिक कलाकृतींमधून अनेकदा आर्थिक उत्पन्न मिळत नाही. सोशल मीडियावर मी सतत सक्रिय असल्यामुळे अनेकांना वाटतं की माझ्याकडे भरपूर काम आहे. पण कलात्मक कामाने घरातील बिलं आणि ईएमआय भरले जात नाहीत.”
तिने पुढे सांगितले की, अनेकदा प्रोजेक्ट उशिरा सुरू होतात, काही प्रकल्प मधेच बंद पडतात, तर काही ठिकाणी मानधनही अडकते. “काम हातात असूनही ते नसल्यासारखी परिस्थिती निर्माण होते. माझ्या शरीरयष्टीमुळे माझ्यासाठी संधी मर्यादित आहेत, किंवा कदाचित मी योग्य लोकांपर्यंत पोहोचत नाही,” असेही तिने नमूद केले.
( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
याच कारणामुळे आपणही इतर क्षेत्रांप्रमाणेच काम शोधण्यासाठी पुढाकार घेत असल्याचे सांगत ती म्हणाली, “कॉर्पोरेट क्षेत्रातील लोक जसे विविध प्लॅटफॉर्मवर नोकरी शोधतात, तसेच कलाकारांनीही संधी शोधण्यात कमीपणा मानू नये. गेल्या काही वर्षांत सोशल मीडियामुळे कलाकारांना अनेक संधी मिळाल्या आहेत.”
आपल्या पोस्टचा उद्देश स्पष्ट करत अक्षया म्हणाली, “माझ्यात चांगलं काम करण्याची क्षमता आहे. मेहनत करण्याची तयारी आहे. फक्त योग्य संधी आणि योग्य लोकांपर्यंत पोहोचण्याची गरज आहे.”
अक्षया नाईकच्या या प्रामाणिक पोस्टला सोशल मीडियावर मोठा प्रतिसाद मिळत असून, अनेक कलाकार आणि चाहत्यांनी तिच्या स्पष्टवक्तेपणाचे कौतुक केले आहे. अभिनय क्षेत्रातील संघर्ष आणि वास्तव समोर आणणाऱ्या तिच्या या वक्तव्याची सध्या मनोरंजन विश्वात जोरदार चर्चा सुरू आहे.