( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
झी मराठीवरील ‘सनई चौघडे’ मालिकेत आता कथेला नवे वळण मिळणार आहे. गैरसमज, नात्यांतील तणाव आणि त्यातून होणारी जाणीव यामुळे मालिकेतील मोठे बदल घडताना प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. जेलमधून सुटल्यानंतर शरू जयसाठी स्वागताची तयारी करतेय. मात्र, आपल्या आयुष्यात घडलेल्या सर्व घटनांसाठी जय महिलांनाच जबाबदार धरतो. रागाच्या भरात तो आपल्या कार्यालयातील सर्व महिला कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकतो. जयच्या या निर्णयामुळे शरू खूप दुखावलेय.
गौतम जयसमोर सर्व सत्य आणतो. जयला वाचवण्यासाठी शरूने स्वतःच्या सन्मानाचीही पर्वा केली नाही. शरूच्या संघर्षाची जाणीव होताच जयला आपल्या चुकीचा पश्चात्ताप होणार आहे. तो सर्व महिला कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा कामावर रुजू करून घेणार आहे. दुसरीकडे, परब कुटुंबात असावरीच्या लग्नाची चर्चा सुरू आहे. गौतम जबाबदार आणि स्वतःच्या पायावर उभा राहावा अशी सुभाषची इच्छा आहे. त्यासाठी तो गौतमची परीक्षा घेण्याचं ठरवतो.
दरम्यान, प्रॉडक्ट सर्व्हेदरम्यान शरू जयला सामान्य लोकांशी कसे जोडले जावे हे शिकवते. त्याचा दृष्टिकोन बदलण्यास ती मदत करते. याच वेळी एक वयोवृद्ध जोडपे त्यांना नवरा-बायको समजतात. त्या जोडप्याच्या बोलण्यामुळे जयला शरूमुळे आपल्या आयुष्यात झालेला सकारात्मक बदल जाणवतो.
आता शरू आणि जयच्या नात्याला नवी दिशा मिळणार का? जयचा हा बदल कायम राहणार का? गौतम स्वाच्या पायावर सक्षमपणे उभा राहू शकेल? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे






