
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
झी मराठीवरील ( zee marathi )लोकप्रिय मालिका ‘कमळी’ आपल्या वास्तववादी कथानकामुळे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. समाजातील विविध प्रश्नांवर भाष्य करणारी ही मालिका आता शिक्षण व्यवस्थेतील वाढता व्यावसायिक दृष्टिकोन हा महत्त्वाचा विषय हाताळणार आहे. या नव्या कथानकाला अधिक प्रभावी बनवण्यासाठी प्रेक्षकांचा लाडका अभिनेता शशांक केतकर मालिकेत दमदार एन्ट्री करत असून, तो ‘रितेश सरपोतदार’ ही महत्त्वाची भूमिका साकारणार आहे.
या भूमिकेबद्दल बोलताना शशांक केतकर (shashank ketkar) म्हणाला, “झी मराठीवर पुन्हा परतताना मला खूप आनंद होत आहे. ‘कमळी’सारख्या लोकप्रिय मालिकेचा भाग होण्याची संधी मिळाल्याबद्दल मी झी मराठी, निर्माते आणि प्रेक्षकांचे मनापासून आभार मानतो. ‘रितेश सरपोतदार’ हे पात्र अत्यंत वेगळं आणि अनेक छटा असलेलं आहे.”
शिक्षण, विद्यार्थी आणि पालक हे विषय आपल्याला कायमच जवळचे असल्याचे सांगत शशांकने आजच्या शिक्षण व्यवस्थेवरही भाष्य केले. तो म्हणाला, “आज शिक्षणाकडे व्यवसाय म्हणून पाहण्याची मानसिकता वाढत आहे. अशा लोकांसाठी विद्यार्थ्यांची स्वप्नं, पालकांचे कष्ट, त्यांचे पैसे किंवा भावना यांना काहीच महत्त्व नसते. ‘पैसे द्या आणि यश मिळवा’ हीच त्यांची विचारसरणी असते. रितेश सरपोतदार हे पात्र अशाच महत्त्वाकांक्षी आणि निर्दयी व्यक्तिमत्त्वाचं प्रतिनिधित्व करतं.”
Indrajal Movie: वादानंतरही ‘इंद्रजाल’ची बॉक्स ऑफिसवर दमदार घोडदौड; महाराष्ट्रात अनेक शो हाऊसफुल्ल
मात्र, या भूमिकेचा केवळ नकारात्मक पैलू साकारायचा नसून, तो असा का घडला, त्यामागील कारणं आणि त्याच्या व्यक्तिमत्त्वातील विविध छटा प्रेक्षकांसमोर आणण्याची इच्छा असल्याचेही शशांकने स्पष्ट केले.
दरम्यान, मालिकेतील मुख्य पात्र कमळी तिच्या प्रामाणिकपणा, सचोटी आणि अभ्यासू वृत्तीच्या बळावर या प्रभावशाली व्यक्तीला कसा सामना देते, हे आगामी भागांमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यामुळे ‘कमळी’ मालिकेतील हा नवा संघर्ष प्रेक्षकांसाठी अधिक रंजक ठरणार आहे.