(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
रहस्य, रोमांच आणि थराराचा संगम असलेला ‘इंद्रजाल’ हा हिंदी चित्रपट सध्या प्रेक्षकांच्या पसंतीचा ठरत आहे. प्रदर्शनानंतर चित्रपटातील एका दृश्यावरून सोशल मीडियावर काही ठिकाणी विरोधाची चर्चा रंगली. मात्र, या चर्चांचा प्रत्यक्ष चित्रपटगृहांतील प्रतिसादावर फारसा परिणाम झालेला दिसत नाही. उलट महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, पुणे, सातारासह विविध ठिकाणी अनेक शो हाऊसफुल्ल होत आहेत.
सोशल मीडियावर चित्रपटाविषयी संमिश्र प्रतिक्रिया उमटत असतानाच, प्रत्यक्ष थिएटरमध्ये मात्र कुटुंबीय, तरुणाई आणि मनोरंजनप्रेमी प्रेक्षकांची गर्दी कायम असल्याचे चित्र आहे. त्यामुळे चर्चा आणि वादांपेक्षा प्रेक्षकांनी दिलेली पसंतीच चित्रपटाच्या यशाची खरी पावती ठरत असल्याचे निर्मितीसंस्थेचे मत आहे.
चित्रपटाच्या टीमच्या मते, कोणत्याही कलाकृतीवर मतभेद होणं स्वाभाविक असतं. मात्र, अखेरीस प्रेक्षकांनी थिएटरमध्ये येऊन चित्रपटाला दिलेला प्रतिसाद आणि हाऊसफुल्ल शो हेच त्याच्या यशाचे खरे मोजमाप आहे. त्यामुळे सोशल मीडियावरील चर्चांपेक्षा प्रेक्षकांचे प्रेम अधिक महत्त्वाचे असल्याचे टीमने नमूद केले आहे.
‘इंद्रजाल’चे दिग्दर्शन आणि संकलन जागेश्वर ललिता ढोबळे यांनी केले असून, निर्माती सुचेता अजय निकम यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. अजय शिवराम निकम आणि मंगेश शालीग्राम वैती हे सहनिर्माते आहेत. चित्रपटाचे लेखन नामदेव मुरकुटे यांनी केले असून, छायांकन आकाश सेठी यांनी केले आहे.
प्रदर्शनानंतर सुरू झालेल्या चर्चांदरम्यानही चित्रपटाला मिळणारा प्रतिसाद वाढत असल्याने ‘इंद्रजाल’ची चर्चा अधिक रंगत आहे. प्रेक्षकांनी दाखवलेल्या या विश्वासामुळे चित्रपटाचा प्रवास आणखी यशस्वी होईल, अशी आशा निर्मात्यांनी व्यक्त केली आहे.






