
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
कलर्स मराठीवरील लोकप्रिय धार्मिक मालिकेत ‘जय जय स्वामी समर्थ’ प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे एक भावस्पर्शी, नाट्यमय आणि हृदयाला भिडणारी लीला. मालिकेत सकाळच्या वेळी स्वामी अत्यंत घाईगडबडीत स्थानावरून कुणालाही काही न सांगता निघून जातात, आणि कपिला त्यांचा पाठलाग करते.अक्कलकोटमधील एका छोट्याशा झोपडीत गंगा आणि तिची नऊ महिन्यांची गरोदर सून कावेरी अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत दिवस काढत असतात.
गंगाचा मुलगा सदानंद काही महिन्यांपूर्वी परागंदा झाल्याने घराचा सारा भार या दोघींवर आहे.गुडघेदुखीने त्रस्त गंगा आणि अवघडलेली कावेरी आर्थिक, शारीरिक आणि मानसिक संघर्षात अडकलेल्या या सासू-सुनेच्या आयुष्यात स्वामी अचानक प्रवेश करतात. देवाने काहीच दिलं नाही अशी खंत बाळगणारी आणि देवावरच रुष्ट असलेली गंगा स्वामींनाच आव्हान देते:, “जर देवाला आमची काळजी असेल तर इथे राहून आमचं ओझं हलकं करा!” आणि स्वामी शांतपणे तिचं म्हणणं मान्य करतात. यानंतर सुरू होतो एक अनोखा प्रवास जिथे साक्षात स्वामी गंगाच्या घरात सेवक बनून घरकाम करू लागतात.
गंगा त्यांना आदेश देते, आणि स्वामी निमूटपणे प्रत्येक काम पार पाडतात. कावेरीची हौस-मौज, तिची काळजी, घरातील कामांची लगबग या सगळ्यातून भावनिक आणि ह्युमरस क्षण रंगतात. कपिलाला जेव्हा हे कळतं तेव्हा ती संतापते; गावकऱ्यांना आणि सेवेकऱ्यांना भडकवते की आपल्या स्वामींचा अपमान होतो आहे. पण स्वामी मात्र निश्चल. आणि मग येतो तो थरारक क्षण मध्यरात्री कावेरीला बाळंतकळा सुरू होतात. गंगाला गावभर शोधून सुद्धा सुईण सापडत नाही त्यामुळे तिची काळजी आता भीतीत बदलू लागते.
वेळेवर सुईण मिळाली नाही तर कावेरीच्या आणि होणाऱ्या बाळाच्या जीवाला धोका होऊ शकतो, अशा वेळी स्वामी आदिशक्तीचा मंत्र म्हणू लागतात आणि दाराबाहेरून दिव्य प्रकाश येताना दिसू लागतो. कावेरी आणि गंगा ते पाहत राहतात नेमकं काय घडणार? कावेरीचं बाळंतपण सुखरूप पार पडणार? काय असेल स्वामींची अद्भुत लीला हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.