
( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
आजच्या जेन-झी पिढीचे विचार, नातेसंबंध आणि डेटिंगकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा सतत चर्चेचा विषय ठरत आहे. याच आधुनिक नातेसंबंध, करिअर आणि प्रेमातील गुंतागुंत यांची अनोखी मांडणी करणारी ‘प्रेमाला कंडिशन्स अप्लाय’ ही मराठी सीरिज zee 5वर प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.
या मालिकेची कथा अनन्या आणि ऋषी या दोन महत्त्वाकांक्षी तरुण प्रोफेशनल्सभोवती फिरते.कॉर्पोरेट जगताची झलक, आधुनिक जीवनशैली आणि नात्यांमधील अटी-शर्ती यांची अनोखी सांगड या सिरीजमध्ये घालण्यात आली आहे. प्रेम, करिअर, स्वातंत्र्य आणि वैयक्तिक अपेक्षा यामध्ये समतोल साधताना तरुण पिढीसमोर उभ्या राहणाऱ्या आव्हानांचा वेध ही सिरीज घेते.
कामाच्या ठिकाणी झालेली त्यांची अनपेक्षित भेट त्यांच्या आयुष्याला नवे वळण देते. सुरुवातीला साधी मैत्री म्हणून सुरू झालेला प्रवास हळूहळू एका खास नात्यात रूपांतरित होतो. समान स्वप्ने, एकमेकांविषयीचे आकर्षण आणि भावनिक जवळीक यामुळे अनन्या आणि ऋषी प्रेमात पडतात.
मात्र, कॉर्पोरेट जगतातील नियम, करिअर आणि ऑफिसमधील नातेसंबंधांवर असलेले बंधन यामुळे त्यांच्या प्रेमासमोर अनेक आव्हाने उभी राहतात. प्रेम आणि व्यावसायिक जबाबदाऱ्या यांच्यात समतोल साधताना त्यांना अनेक कठीण निर्णय घ्यावे लागतात.
सिरीजच्या पहिल्या भागात निखिलच्या पार्टीत या दोघांची पहिली भेट होते. पहिल्या भेटीतच त्यांच्यात निर्माण होणारी जवळीक आणि आकर्षण जेन-झी पिढीच्या ‘इन्स्टंट कनेक्शन’ची झलक दाखवते.मात्र, कथेला खरे वळण मिळते ते दुसऱ्या दिवशी. दुसऱ्याच दिवशी अनन्या ऋषीच्या कंपनीत इंटर्न म्हणून रुजू होते. विशेष म्हणजे ती त्याच्याच टीममध्ये काम करू लागते.दोघे एकमेकांच्या जवळ येत असतानाच त्यांच्यासमोर मोठा अडथळा उभा राहतो. कंपनीची ‘नो डेटिंग’ पॉलिसी त्यांच्या नात्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करते. प्रेम आणि करिअर यामध्ये ते कोणता मार्ग निवडतात, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
कामाच्या ठिकाणी ‘नो डेटिंग’ हा नियम असल्याने ऋषी आणि अनन्याच्या वाढत्या नात्यासमोर मोठे आव्हान उभे राहते. प्रेम आणि करिअर यांपैकी कोणाला प्राधान्य द्यायचे, हा प्रश्न त्यांच्या आयुष्यात गुंतागुंत निर्माण करतो.या नियमांमुळे त्यांच्या नात्याचे पुढे काय होते? प्रेम जिंकते की कॉर्पोरेट पॉलिसी? याची उत्तरे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना ‘प्रेमाला कंडिशन्स अप्लाय’ ही सीरिज पाहावी लागणार आहे.
या सिरीजचा विषय ताजा असला तरी काही ठिकाणी कथा भरकटल्यासारखी वाटते. कॉर्पोरेट जीवन आणि प्रेम यामधील संघर्ष दाखवताना अनेक प्रसंग प्रभावी ठरतात, मात्र काही गोष्टी अर्धवट राहिल्याची भावना निर्माण होते. नव्या पिढीची जीवनशैली दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला असला तरी ती प्रामुख्याने पेहराव आणि काही संवादांपुरतीच मर्यादित राहिली आहे.
या सिरीजमध्ये प्रमुख भूमिकेत सिद्धार्थ मेनन आणि जान्हवी उदय हे पाहायला मिळत आहेत. या दोघांनी त्यांच्या भूमिका प्रभावीपणे साकारल्या आहेत. दोघांमधील केमिस्ट्री आणि नात्यातील चढ-उतार प्रेक्षकांना गुंतवून ठेवतात. तसेच कांदबरी कदम, मीरा कुलकर्णी, मनमित पेम आणि इतर कलाकारांनीही आपल्या भूमिका चोख बजावल्या आहेत.
मात्र, जेन-झी पिढीची डेली लाईफ आणि विचारसरणी अधिक प्रभावीपणे मांडण्याची संधी काही प्रमाणात हुकल्याचे जाणवते. या सिरीजमधील काही संवाद पुन्हा पुन्हा रिपीट झाल्याने ते प्रेक्षकांना खटकतील.कॉर्पोरेट जग आणि प्रेमकथा यांच्यात समतोल साधण्याचा प्रयत्न असला तरी काही ठिकाणी कथा अपेक्षित प्रभाव निर्माण करण्यात कमी पडते.तरीही नव्या पिढीच्या नातेसंबंधांवर आणि बदलत्या जीवनशैलीवर भाष्य करणारा हा एक वेगळा प्रयोग आहे. त्यामुळे तरुण प्रेक्षकांसाठी ही सीरिज एकदा पाहण्यासारखी ठरते.