
( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
मराठी मनोरंजनविश्वातील काही नाती पडद्यापलीकडेही जपली जातात. अभिनेत्री तेजश्री प्रधान आणि निवेदिता सराफ यांचं नातं हे त्याचं उत्तम उदाहरण आहे. ‘अग्गंबाई सासूबाई’ मालिकेत सासू-सुनेच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनात घर करणाऱ्या या दोघींचा जिव्हाळा आजही कायम आहे.
सध्या निवेदिता सराफ झी मराठीवरील ‘कृष्णाईच्या लेकी’ या नव्या मालिकेत कृष्णाईच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. या मालिकेच्या निमित्ताने तेजश्री आणि निवेदिता सराफ यांची पुन्हा एकदा खास भेट झाली. ‘वीण दोघातली हे तुटेना’ मालिकेत स्वानंदीची भूमिका साकारणारी तेजश्री प्रधान नुकतीच ‘कृष्णाईच्या लेकी’च्या प्रमोशनल शूटसाठी सेटवर पोहोचली होती.
खानावळीच्या सेटवर कृष्णाई आणि तिच्या लेकींसोबत चित्रीकरण करताना तेजश्रीला ‘अग्गंबाई सासूबाई’ मालिकेच्या अनेक आठवणींना उजाळा मिळाला. निवेदिता ताईंना पुन्हा भेटून त्यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव खास असल्याचे तेजश्रीने सांगितले.
या भेटीबद्दल बोलताना तेजश्री म्हणाली, “निवेदिता ताईंना भेटण्याचा अनुभव नेहमीच खास असतो. ‘कृष्णाईच्या लेकी’च्या सेटवर क्रॉस प्रमोशनसाठी गेले होते आणि खूप मजा आली. ‘अग्गंबाई सासूबाई’च्या दिवसांच्या अनेक आठवणी पुन्हा जाग्या झाल्या. पहिल्या प्रोमो शूटच्या दिवशीच आमचं इतकं छान जुळून आलं होतं की आम्ही सतत गप्पा मारत होतो. तेव्हा डॉ. गिरीश ओक यांनी ‘संपूर्ण मालिकेसाठी थोड्या गप्पा राखून ठेवा’ असं म्हटलं होतं आणि आम्ही सगळे खळखळून हसलो होतो. तो प्रसंग आजही लक्षात आहे.”
तिने पुढे ‘कृष्णाईच्या लेकी’ मालिकेच्या टीमचंही कौतुक केलं. “कृष्णाईच्या तीनही लेकी खूप छान आहेत. संपूर्ण टीम उत्तम आहे. झी मराठी नेहमी वास्तववादी विषय आणि भावना प्रेक्षकांसमोर आणतं. निवेदिता ताई आणि मी पुन्हा एकदा झी मराठीवर एकत्र आलो आहोत, याचा आम्हा दोघींनाही आनंद आहे. सेट, दिग्दर्शन टीम, डीओपी आणि विशेषतः खानावळीचा सेट अतिशय सुंदर तयार करण्यात आला आहे,” असं ती म्हणाली.
निवेदिता सराफ यांच्या स्वभावाविषयी बोलताना तेजश्री भावूक झाली. “मला निवेदिता ताई खूप आवडतात. त्या अत्यंत बुद्धिमान आणि प्रतिभावान अभिनेत्री आहेत. त्यांच्या आसपास काम करताना एक सकारात्मक ऊर्जा जाणवते. त्यांची एक खास सवय म्हणजे तुम्ही एखादी आवडीची गोष्ट सहज बोलून जाता आणि विसरूनही जाता. पण त्या ती लक्षात ठेवतात आणि काही दिवसांनी स्वतः बनवून घेऊन येतात. इतका त्यांचा आपुलकीचा स्वभाव आहे,” असे तेजश्रीने सांगितले.
याच जिव्हाळ्याची प्रचिती देताना ती म्हणाली, “त्या माझ्यासाठी इतक्या जवळच्या आहेत की मला मासे खायची इच्छा झाली तर मी कधीही त्यांच्या घरी जाऊ शकते. ते माझं हक्काचं घर आहे.” तेजश्रीच्या या मनोगतातून तिचे आणि निवेदिता सराफ यांचे पडद्यावरील नाते आता खऱ्या आयुष्यातील घट्ट कौटुंबिक नात्यात रुपांतरित झाल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले.