(Photo - Social Media)
नवी दिल्ली : नुकतेच NEET पेपरफुटीवरून देशभरात कॉकरोच जनता पार्टीकडून जोरदार आंदोलन करण्यात आले. देशातील एकूण शिक्षण पद्धतीवरून सोनम वांगचुक, अभिजित दिपके यांच्यासह अनेक Gen-Z आंदोलकांकडून यशस्वी आंदोलन करण्यात आले. आता पुन्हा एकदा सरकारी नोकऱ्यांमधील कथित अनियमितता आणि भरती प्रक्रियेतील गैरप्रकारांच्या मुद्द्यावर आंदोलन पेटण्याची शक्यता असून योगगुरु बाबा रामदेव यांनी यावरून आक्रमक भूमिका घेतली आहे. सरकारी नोकरीच्या मुलाखतींमध्ये मोठ्या प्रमाणावर हेराफेरी होत असल्याचा आरोप करत त्यांनी परिस्थितीत सुधारणा झाली नाही तर पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहण केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना बाबा रामदेव यांनी सरकारी भरती प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केले. काही ठिकाणी विशिष्ट जात, वर्ग किंवा संघटनेशी संबंधित उमेदवारांना झुकते माप दिले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. इतर पात्र उमेदवारांना मात्र डावलले जात असल्याचेही ते म्हणाले.
सरकारी नोकरीच्या भरतीमध्ये मुलाखतीचा टप्पा महत्त्वाचा असतो. मात्र याच प्रक्रियेत गैरप्रकार होत असल्याचा दावा बाबा रामदेव यांनी केला. लाचखोरी आणि शिफारशीच्या तक्रारी समोर येत असल्याचे त्यांनी सांगितले. ९० ते ९९ टक्के सरकारी नोकरीच्या मुलाखतींमध्ये हेराफेरी होत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.
स्वतःच्या गटातील, जातीत किंवा वर्गातील व्यक्तींना संधी देऊन इतरांना बाजूला करण्याची पद्धत न्याय्य नसल्याचे बाबा रामदेव यांनी म्हटले. भरती प्रक्रियेत पैशांचा वापर होत असेल तर त्यावर कठोरपणे नियंत्रण आणण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सरकारी नोकऱ्यांबरोबरच शाळा आणि महाविद्यालयांमधील सुविधांच्या प्रश्नावरही बाबा रामदेव यांनी भाष्य केले. अनेक विद्यार्थी वीज, पाणी आणि पुस्तकांसारख्या मूलभूत सुविधांच्या कमतरतेबाबत तक्रारी करत असल्याचे त्यांनी सांगितले.
परीक्षेत उत्तीर्ण होऊनही विद्यार्थ्यांच्या दहावी-बारावीच्या गुणांना अपेक्षित महत्त्व मिळत नसल्याचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला. निवड प्रक्रिया प्रामुख्याने स्पर्धात्मक परीक्षांवर आधारित असल्याचे त्यांनी नमूद केले.
देशातील भ्रष्टाचार आणि अस्वस्थतेवर चिंता व्यक्त करताना बाबा रामदेव यांनी आपण अराजकतेचे समर्थन करत नसल्याचे स्पष्ट केले. मात्र समस्या सोडवण्यासाठी ठोस उपाययोजना आवश्यक आहेत, असे ते म्हणाले.
CJPच्या ‘School Thik Karo’ मोहीमेला आजपासून सुरुवात; ग्रामीण भागातील शाळांमध्ये घडणार मोठा बदल
सरकारी नोकऱ्यांमधील व्यवस्थेत सुधारणा झाली नाही तर आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला. त्याचबरोबर राजकीय पक्षांनी आपापसातील मतभेद बाजूला ठेवून राष्ट्रीय हितासाठी एकत्र काम करण्याचे आवाहनही त्यांनी केले. देशाच्या हितासाठी संघर्ष करताना परस्पर द्वेष टाळावा आणि सकारात्मक कामांचे कौतुक करावे, असेही बाबा रामदेव यांनी सांगितले.

