
पाटण्यात BPSC अभ्यर्थी रस्त्यावर; 15 विद्यार्थी संघटनांचा मोर्चा, पेपर लीकच्या चौकशीसह फेरपरीक्षेची मागणी
BPSC Students Protest: महिन्याभरापूर्वी दिल्लीमध्ये कॉकरोच जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले होते. खासगी क्षेत्रातील शिक्षणामुळे स्पर्धा वाढली आहे. विद्यार्थ्यांसाठी पालक लाखो रुपये कोचिंग क्लासेसवर खर्च करत आहेत. तर आता बिहारची राजधानी पाटणा येथे स्पर्धा परीक्षा आणि भरती प्रक्रियेतील अनियमिततांविरोधात विद्यार्थी संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. मंगळवारी (25 ऑगस्ट 2026) 15 विद्यार्थी संघटनांनी गांधी मैदानातून मोर्चाला सुरुवात झाली असून मोठ्या संख्येने सहभागी झालेले विद्यार्थी हातात तिरंगा, भगतसिंग यांची छायाचित्रे आणि विविध मागण्यांचे फलक घेऊन रस्त्यावर उतरले.
या आंदोलनादरम्यान गांधी मैदानातून निघालेल्या आंदोलकांनी पुढे जात प्रतिबंधित भागात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी उभारलेले बॅरिकेड्स तोडल्याचेही समोर आले. परिस्थिती लक्षात घेऊन पाटण्यातील अनेक महत्त्वाच्या भागांत सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली. पोलिसांनी आंदोलकांना शांतता राखण्याचे आणि प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश न करण्याचे आवाहन केले.
गव्हाची निर्यातबंदी हटवली; पीठ, रवा व इतर पदार्थांच्या निर्यातीलाही परवानगी
आंदोलकांनी BPSC आणि इतर भरती प्रक्रियांशी संबंधित अनेक मागण्या मांडल्या आहेत. संविदा कर्मचाऱ्यांना भरतीमध्ये दिले जाणारे अतिरिक्त वेटेज पूर्णपणे रद्द करण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. सर्व उमेदवारांना समान संधी मिळावी आणि संपूर्ण भरती प्रक्रिया पारदर्शक व निष्पक्ष असावी, अशी त्यांची भूमिका आहे. याशिवाय BPSSC अध्यक्ष के. एस. द्विवेदी यांच्या संपत्तीची निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही आंदोलकांकडून करण्यात आली.
आंदोलनाचा प्रमुख मुद्दा 70वी BPSC परीक्षा आहे. आंदोलक उमेदवारांच्या आरोपानुसार या परीक्षेत अनियमितता झाली असून कथित पेपर लीक प्रकरणाची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी परीक्षा रद्द करून नव्याने परीक्षा आयोजित करण्याची मागणी केली आहे. परीक्षेच्या विश्वासार्हतेबाबत निर्माण झालेल्या प्रश्नांचे स्पष्ट उत्तर प्रशासनाने द्यावे आणि उमेदवारांच्या शंकांचे निरसन करावे, अशी आंदोलकांची मागणी आहे.
विद्यार्थ्यांच्या मागण्या केवळ 70व्या BPSC परीक्षेपुरत्या मर्यादित नाहीत. प्रस्तावित Teacher Recruitment Examination अर्थात TRE 4.0 च्या प्रक्रियेतही बदल करण्याची मागणी करण्यात आली आहे. TRE 4.0 परीक्षा सिंगल स्टेज पद्धतीने घेण्यात यावी तसेच निगेटिव्ह मार्किंगची पद्धत रद्द करण्यात यावी, अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे. या बदलांमुळे शिक्षक भरती प्रक्रिया अधिक सोपी आणि उमेदवारांसाठी न्याय्य होईल, असा आंदोलकांचा दावा आहे.
मोर्चादरम्यान आंदोलकांनी प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्यानंतर पोलिसांनी त्यांना पुढे न जाण्याची सूचना केली. विद्यार्थ्यांनी शांतता राखावी आणि मोर्चा मागे घ्यावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले. DSP कामाख्या नारायण सिंह यांनी वरिष्ठ अधिकारी आणि विद्यार्थी प्रतिनिधींमध्ये सकारात्मक चर्चा झाल्याचे सांगितले. चर्चेनंतर विद्यार्थी मोर्चा मागे घेतील, अशी अपेक्षाही प्रशासनाने व्यक्त केली.
एकीकडे पोलिसांकडून परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचे प्रयत्न सुरू असताना दुसरीकडे आंदोलक आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. त्यामुळे 70वी BPSC परीक्षा, भरती प्रक्रियेतील पारदर्शकता आणि TRE 4.0 मधील प्रस्तावित बदलांचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे.