गुजरात मधून एक मोठी बातमी समोर येत आहे. गुजरात विद्यापीठातील वसतिगृहात शनिवारी रात्री जमावाने परदेशी विद्यार्थ्यांवर हल्ला केला. आफ्रिकन देश, अफगाणिस्तान आणि उझबेकिस्तानमधील विद्यार्थी नमाज पठण करत असताना जमावाने त्यांच्यावर हल्ला (Foreign students attacked in Gujarat University) केला. काठ्या आणि चाकूने सज्ज झालेल्या जमावाने परदेशी विद्यार्थ्यांना बेदम मारहाण केली. या हल्ल्यात किमान पाच परदेशी विद्यार्थी जखमी झाले आहेत. राज्याचे गृहमंत्री हर्ष संघवी म्हणाले की, लवकरच आरोपींना अटक करून या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी केली जाईल.
[read_also content=”‘शैतान’ ला प्रेक्षकांची पंसती, अजय देवगण आणि आर माधवनच्या चित्रपटानं नवव्या दिवशी केली इतकी कमाई! https://www.navarashtra.com/movies/shaitaan-box-office-collection-day-9-is-8-crore-nrps-516028.html”]
विद्यार्थ्यांनी सांगितले की, अहमदाबाद येथील कॅम्पसमध्ये एकही मशीद नाही. त्यामुळे ते वसतिगृहात एका ठिकाणी रमजानमध्ये रात्री अदा करण्यात येणारी तरावीह नमाज अदा करण्यासाठी जमले होते. दरम्यान, काठ्या आणि चाकूने सज्ज झालेल्या जमावाने त्यांच्यावर अचानक हल्ला केला. जमावाने त्यांच्यावर हल्ला करत खोल्यांची तोडफोड केली. वसतिगृहाच्या सुरक्षा रक्षकांनी त्या लोकांना रोखण्याचा प्रयत्न केला पण त्यांची संख्या जास्त असल्याने ते शक्य झाले नाही.
एका अफगाण विद्यार्थ्याने सांगितले की, जमाव सतत घोषणा देत होता. वसतिगृहात नमाज अदा करण्यास कोणी परवानगी दिली, अशी विचारणा त्यांनी केली. जमावाने खोल्यांमध्ये घुसून विद्यार्थ्यांवर हल्ला केला. लॅपटॉप आणि फोन तोडले. बाहेर उभ्या असलेल्या दुचाकींच्या काचा फोडल्या. पोलिस पोहोचेपर्यंत जमाव पळून गेला होता.
या हल्ल्यात किमान पाच विद्यार्थी जखमी झाले आहेत. जखमी विद्यार्थ्यांमध्ये प्रत्येकी एक विद्यार्थी अफगाणिस्तान, श्रीलंका आणि तुर्कमेनिस्तानचा असून दोन विद्यार्थी आफ्रिकन देशांतील आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. संबंधित दूतावासांनाही कळविण्यात आले आहे.
अहमदाबाद शहराचे पोलिस आयुक्त जीएस मलिक म्हणाले की पोलिसांनी तपास सुरू केला आहे. सुमारे 300 परदेशी विद्यार्थी येथे शिक्षण घेतात. ते अफगाणिस्तान, श्रीलंका आणि आफ्रिकन देशांतील आहेत. काल काही जण गच्चीवर नमाज अदा करत होते. काही लोक आले आणि त्यांनी असे का करत आहात आणि त्यांनी मशिदीत नमाज अदा करावी असे विचारले. यावरून जोरदार वादावादी व हाणामारी झाली. यानंतर बाहेरील लोकांनी दगडफेक करत वसतिगृहाच्या खोल्यांची तोडफोड केली.






