
Former Army Chief Manoj Mukund Naravane' Four Stars of Destiny book controversy
मनोज मुकुंद नरवणे हे माजी सेनाप्रमुख असून त्यांच्या आत्मकथनामध्ये अनेक धक्कादायक दावे करण्यात आले आहेत. नरवणे यांच्या पुस्तकामध्ये देशाच्या संवेदनशील सैन्य कारवाई आणि त्यामागील राजकीय हालचाली याबाबत उल्लेख करण्यात आल्याची शक्यता आहे. अद्याप हे पुस्तक प्रकाशनाच्या कचाट्यामध्ये अडकले आहे. काही महिन्यांपूर्वी या पुस्तकातील काही भाग व्हायरल झाला होता. त्याचबरोबर अग्नीवीर योजनेबाबत देखील अनेक दावे करण्यात आले होते.
हे देखील वाचा : संसद हादरली! “…काय साध्य करायचे आहे?” राहुल गांधींच्या चीनच्या ‘त्या’ मुद्द्यावर संरक्षणमंत्र्यांचा विरोध
2020 साली गलवान क्षेत्रामध्ये चीनी सैनिकांकडून आक्रमण करण्यात आले होते. चीनी सैनिकांनी भारतीय सैनिकांवर हल्ला केला होता. यावेळी मनोज मुकुंद नरवणे हे सेनाप्रमुख होते. त्यांनी पुस्तकामध्ये या घटनांचा उल्लेख केला आहे. या पुस्तकात ३१ ऑगस्ट २०२० च्या रात्री, ज्या दिवशी चीनी सैन्याने लडाखमधील रेचिन ला खिंडीतून घुसखोरी केली होती, त्या दिवशी नरवणे आणि तत्कालीन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यात झालेल्या चर्चेचे वर्णन केले आहे. पुस्तकात असे म्हटले आहे की जेव्हा राजनाथ सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना याबद्दल माहिती दिली तेव्हा मोदींनी त्यांना “तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा” असे निर्देश दिले.
‘फोर स्टार्स ऑफ डेस्टिनी’ पुस्तकावरुन वाद
माजी सेनाप्रमुख नरवणे यांच्या कार्यकाळात, जून २०२२ मध्ये, देशात अग्निवीर योजना लागू करण्यात आली. अग्निवीर योजनेअंतर्गत भरती होणाऱ्या ७५% तरुणांना कायम ठेवण्याचा प्रस्ताव लष्कराने ठेवला असला तरी, सरकारने तो २५% पर्यंत कमी केला. शिवाय, या सैनिकांना फक्त २०,००० रुपये वेतन दिले जात होते, परंतु नंतर ते वाढवून ३०,००० रुपये करण्यात आले. याबाबत देखील त्यांनी फोर स्टार्स ऑफ डेस्टिनी या पुस्तकामध्ये लिहिले असल्याची शक्यता आहे.
हे देखील वाचा : संसदेचे वातावरण तापणार! अर्थसंकल्पावरुन विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरणार
या पुस्तकाचा उल्लेख करुन लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी चीनीच्या घुसखोरीवरुन संसदेमध्ये प्रश्न उपस्थित केले. चीनने भारताच्या हद्दीमध्ये चार तळ ठोकले असून कैलास पर्वतावर देखील आक्रमक केल्याचे राहुल गांधी म्हणाले आहेत. दरम्यान राहुल गांधी यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणादरम्यान संसदेत चीनचा आणि डोकलामचा मुद्दा उपस्थित केला आहे. संसदेमध्ये माजी सेनाप्रमुख नरवणे यांच्या प्रकाशित न झालेल्या पुस्तकाचा संदर्भ देत राहुल गांधींनी संरक्षण मंत्री आणि पंतप्रधानांचा उल्लेख केला. यामुळे लोकसभेमध्ये मोठा गदारोळ झाला. या प्रकरणामुळे लोकसभेचे कामकाज तीन वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले आहे.