
देशातील अनेक भागांत तापमानात वाढ; राजधानी दिल्लीत उष्णतेने 15 वर्षांचा रेकॉर्डच मोडला, पुढील 7 दिवस...
नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल जाणवत आहे. काही ठिकाणी पाऊस झाल्याचे पाहिला मिळाले तर काही ठिकाणी अद्याप उष्णतेची लाट कायम आहे. असे असताना आता हवामान विभागाने 22 ते 27 मे या कालावधीत दिल्लीसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तीव्र उष्णता आणि उष्णतेच्या लाटेची शक्यताही यादरम्यान व्यक्त केली आहे.
22 ते 27 मे या काळात, कमाल तापमान ४४ ते ४६ अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २९ ते ३२ अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे. आकाश बहुतांशी निरभ्र राहील, ज्यामुळे सूर्यप्रकाशाची तीव्रता आणखी वाढेल. दिल्लीतील रहिवासी सध्या तीव्र उष्णतेचा सामना करत आहेत. पश्चिमेकडून वाहणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे राजधानी भट्टीसारखी तापली आहे. परिस्थिती इतकी गंभीर आहे की, गेल्या बुधवारी रात्री १५ वर्षांचा विक्रम मोडला गेला. किमान तापमान ३१.९ अंश सेल्सिअस नोंदवले गेले, जे हंगामाच्या सरासरीपेक्षा ५.२ अंशांनी जास्त होते.
दुसरीकडे, गुरुवारी दिल्लीतील रहिवाशांना तीव्र उष्णतेचा त्रास सहन करावा लागला. दिवसभर उष्णतेची लाट कायम होती, बहुतेक भागांमध्ये दिवसाचे तापमान ४४ किंवा ४५ अंशांपेक्षा जास्त नोंदवले गेले. सलग सहाव्या दिवशी पारा ४० अंश सेल्सिअसच्या वर राहिला असून, कमाल तापमान ४१.७ अंश सेल्सिअस होते.
सफदरजंग आणि लोधी रोड या केंद्रांवर सर्वाधिक उष्णतेची नोंद झाली. जेव्हा कमाल तापमान ४० अंश सेल्सिअस किंवा त्याहून अधिक होते आणि किमान तापमान सामान्यपेक्षा ४.५ ते ६.४ अंश सेल्सिअसने कमी असते, तेव्हा उष्ण रात्रीची घोषणा केली जाते. मात्र, येत्या काही दिवसांत या तीव्र उष्णतेपासून कोणताही दिलासा मिळणार नसल्याचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त केला जात आहे.
वर्ध्यात तापमानाचा पारा पोहोचला 47.1 अंशांवर
विदर्भात सूर्य आग ओकत असून, उष्णतेच्या तीव्र लाटेने संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. बुधवारी वर्ध्यात पारा ४७.१ अंश सेल्सिअसवर पोहोचल्याने नागरिक अक्षरशः होरपळून निघाले. यावर्षी उन्हाळ्यात तीनदा वर्धा जिल्ह्याचे तापमान ४६.५ अंशावर गेले होते. बुधवारी सर्व विक्रम मोडीत काढत तापमानाने उच्चाक गाठला. तर नागपूर येथे ४६.६ अंश तापमानाची नोंद करण्यात आली.