मध्य भारतात पावसाची ६५ टक्के तूट
Maharashtra Mansoon Alert: देशभरात वाढत्या उष्णतेमुळे नागरिक हैराण झाले असतानाच, भारतीय हवामान विभागा (IMD) कडून मान्सूनबाबत दिलासादायक बातमी समोर आली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, नैऋत्य मान्सून वेगाने पुढे सरकत असून तो येत्या २६ मेपर्यंत केरळ किनारपट्टीवर दाखल होण्याची शक्यता आहे. यंदा मान्सूनने नेहमीपेक्षा लवकर अंदमान समुद्र आणि बंगालच्या उपसागरात प्रवेश केल्याने पावसाळा लवकर सुरू होण्याची चिन्हे दिसत आहेत.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार नैऋत्य मान्सून आता वेगाने पुढे सरकत असून, येत्या 26 मे रोजी तो केरळमध्ये दाखल होण्याची दाट शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मान्सून सक्रिय होण्यासाठी आणखी दोन ते तीन दिवस लागू शकतात, असे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. दरम्यान, देशातील किमान दहा राज्यांमध्ये मुसळधार पाऊस, वेगवान वारे, धुळीची वादळे आणि विजांच्या कडकडाटाचा इशारा देण्यात आला आहे.
MLC Election 2026: परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात राजकीय
हवामान खात्यानुसार, महाराष्ट्रासह ओडिशा ते पश्चिम बंगालपर्यंतच्या भागात पुढील काही दिवसांत पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. मध्य भारतात कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाल्यामुळे उकाड्यापासून दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत. महाराष्ट्र, मराठवाडा आणि कर्नाटक परिसरातही वातावरणीय बदल दिसून येत असून, विदर्भ वगळता राज्यातील अनेक भागांत तुरळक पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
सध्या अंदमान-निकोबार बेटांवर मान्सून सक्रिय झाला असून, त्याचा परिणाम कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रावरही दिसून येत आहे. अरब सागर आणि बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या दमट वाऱ्यांमुळे पावसासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे.
महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि घाटमाथा परिसरात जोरदार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. तसेच रत्नागिरी, सातारा, यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यांमध्येही काही ठिकाणी पावसाचा शिडकावा होऊ शकतो. यामुळे तापमानात घट होण्यास मदत होणार असली, तरी रात्रीचा उकाडा वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
हवामान विभागाने राज्यातील काही जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. विशेषतः कोकण पट्टा आणि घाटमाथा भागात मुसळधार पावसासह वीजांच्या कडकडाटाचा इशारा देण्यात आला आहे. दुसरीकडे, विदर्भातील अनेक जिल्हे अद्याप तीव्र उष्णतेच्या लाटेचा सामना करत आहेत. उष्णतेमुळे जनजीवन विस्कळीत झाले असून पशू-पक्ष्यांनाही मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
IMD च्या माहितीनुसार, १६ मे रोजी नैऋत्य मान्सूनने आग्नेय अरबी समुद्र, नैऋत्य आणि आग्नेय बंगालचा उपसागर, अंदमान समुद्राचे अनेक भाग, संपूर्ण निकोबार बेटे तसेच श्री विजयपुरमसह अंदमान बेटांच्या काही भागांमध्ये अधिकृतपणे प्रवेश केला. मान्सूनची ही प्रगती सामान्यपेक्षा जलद मानली जात आहे.
हवामान विभागाने स्पष्ट केले आहे की, केरळमध्ये दाखल झाल्यानंतर पुढील तीन ते चार दिवसांत मान्सून आग्नेय अरबी समुद्राच्या उर्वरित भागात, बंगालच्या उपसागरात आणि अंदमान परिसरात आणखी वेगाने सक्रिय होईल. मान्सूनच्या सध्याच्या प्रगतीचा वेग पाहता, मुंबईमध्येही यंदा पावसाळा लवकर सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हवामान तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, मान्सून सुमारे १० जूनपर्यंत मुंबईत दाखल होऊ शकतो. त्यामुळे राज्यातील उष्णतेपासून नागरिकांना दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.






