
गुजरात, ओडिशासह देशातील 12 राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा
नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल जाणवत आहे. त्यात आता हवामान विभागाने १२ राज्यांमध्ये मुसळधार पाऊस, मेघगर्जनेसह पाऊस आणि वादळांचा इशारा दिला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, दिल्ली, उत्तरप्रदेश, बिहार, छत्तीसगड, ओडिशा, गुजरात, तामिळनाडू, राजस्थान, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, जम्मू-काश्मीर, अरुणाचल प्रदेश व नागालँड या राज्यांना पावसाचा इशारा दिला आहे.
या काळात वाऱ्याचा वेग ताशी ६० किलोमीटरपर्यंत पोहोचू शकतो. भारतीय हवामान विभागाने पुढील तीन दिवसांसाठी राज्यातील काही भागांमध्ये, तसेच शेजारील अरुणाचल प्रदेश आणि नागालँडमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पाऊस आणि मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तवला आहे. हवामान विभागाने दिल्लीसह संपूर्ण राष्ट्रीय राजधानी क्षेत्रासाठी मेघगर्जनेसह पाऊस, विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यांचा इशारा दिला आहे.
Maharashtra Rain Alert : राज्यावर भीषण संकट ! ‘या’ भागांमध्ये मुसळधार पाऊस; खडकवासला धरणातून…
दरम्यान, जम्मू आणि काश्मीरमधील डोडा आणि किश्तवार जिल्ह्यांच्या बहुतांश भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. शेजारील किश्तवार जिल्ह्यातही, सततच्या मुसळधार पावसामुळे रस्ते निसरडे होण्याची आणि दगड कोसळण्याची चिंता जिल्हा प्रशासनाने व्यक्त केली आहे. जनतेला सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
जुलैमध्ये पावसाची विक्रमी नोंद
महाराष्ट्रातही मुसळधार पाऊस झाल्याचे पाहिला मिळाले. मुंबईसह इतर अनेक शहरांत पाऊस झाला होता. त्यात पुणे शहराने यंदाच्या जुलैमध्ये विक्रमी पावसाची नोंद करत ११९ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या (आयएमडी) शिवाजीनगर वेधशाळेच्या नोंदीनुसार, बुधवारी (ता. २९) सकाळपर्यंत जुलै महिन्यात ५०८.९ मिमी पावसाची नोंद झाली आहे. यापूर्वी १९०७ मध्ये ५०८.५ मिमी पावसाची नोंद झाली होती. त्यामुळे तब्बल ११९ वर्षांनंतर पुण्यात जुलै महिन्यातील सर्वाधिक पावसाचा नवा विक्रम प्रस्थापित झाला आहे.
महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम
दुसरीकडे, राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर कायम असल्याचे दिसून येत आहे. कोकण, विदर्भ, मराठवाडा भागात मुसळधार पाऊस सुरू आहे. येत्या काही दिवसांमध्ये विदर्भ आणि मराठवाडा जोरदार पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. हिंगोली जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन देण्यात आले आहे.