
ईशान्य ते मध्य भारतातील अनेक राज्यांत पाऊस
नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल जाणवत आहे. पावसाने उघडीप दिल्याचे दिसत असताना आता देशात मान्सूनचा जोर पुन्हा एकदा वाढला आहे. भारतीय हवामान विभागाने शुक्रवारी दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार आणि ओडिशासह 22 राज्यांमध्ये मुसळधार पाऊस आणि जोरदार वादळी पावसाचा इशारा दिला आहे.
हवामानशास्त्रज्ञांच्या मते, या काळात ताशी ८० ते ९० किलोमीटर वेगाचे वादळी वारे वाहण्याची शक्यता असून, त्यामुळे उभ्या पिकांचे आणि सखल भागांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, सर्वात गंभीर परिस्थिती ओडिशामध्ये अपेक्षित आहे, जिथे २८ ते ३१ ऑगस्ट दरम्यान अनेक भागांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. दरम्यान, बिहारमध्ये मुसळधार पावसासह मध्यम ते तीव्र स्वरूपाचा विजांचा कडकडाट आणि ताशी ३० ते ४० किमी वेगाचे वारे वाहण्याची शक्यता आहे.
दरम्यान, दिल्लीत ताशी ४० ते ५० किमी वेगाच्या वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता असून, कमाल तापमान ३६ अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २९ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेशातील अनेक जिल्ह्यांमध्ये पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. बांदा येथील सखल भागात पाणी साचले असून, झाशी आणि लखनौमधील प्रशासनाने जोरदार वीजप्रपातामुळे सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे.
अनेक राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा
ईशान्येकडील अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरा या राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडेल. पश्चिम बंगाल, सिक्कीम, उत्तराखंड आणि झारखंडमध्येही मेघगर्जनेसह पाऊस राहील असा अंदाज आहे. दक्षिण आणि पश्चिम भारतातील केरळ, किनारपट्टीवरील कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, महाराष्ट्र आणि गुजरातमध्येही जोरदार वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. डोंगराळ भागात भूस्खलनाचा धोका आणि मैदानी भागात पाणी साचण्याच्या शक्यतेमुळे प्रशासनाने सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे.
महाराष्ट्रात हलका पाऊस
शुक्रवारी, महाराष्ट्राच्या बहुतांश भागात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता असून तुरळक ठिकाणी हलका पाऊस किंवा सरींची शक्यता आहे. मुंबई आणि आसपासच्या किनारपट्टीच्या भागात ढगाळ आकाशासह हलका ते मध्यम पाऊस पडेल.