
अमित शाहच भाजपचे खरे सम्राट
नवी दिल्ली : पक्ष संघटनेपासून मंत्रालयांपर्यंत आणि तिथून राज्य सरकारांच्या स्थापनेपर्यंत, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची इच्छाशक्ती आणि धोरणे आता भाजपमध्ये सर्वोच्च अधिकार बनली आहेत. नुकत्याच पार पडलेल्या पाच राज्यांतील निवडणुकांमध्ये आणि त्यापूर्वी बिहारमध्ये ज्या प्रकारे पक्षाने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची धोरणे, राजकारण आणि रणनीती स्वीकारली आहे. त्यावरून हे स्पष्टपणे दिसून येते की, ते भाजपसाठी अपरिहार्य बनले आहेत. त्यांच्याशिवाय भाजप विजयाचा विचारही करू शकत नाही.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना भाजपमध्ये संघटनेपासून मंत्रालयांपर्यंत आणि सरकारपर्यंत इतका सखोल अनुभव आहे की, ते अगदी मोठे प्रश्नही सहजपणे सोडवू शकतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील त्यांच्या विश्वासाचाच हा परिणाम आहे की जेव्हा-जेव्हा भाजपच्या निवडणुकीच्या तयारीचा प्रश्न येतो, तेव्हा संपूर्ण जबाबदारी अमित शाह यांच्या खांद्यावर असते. बिहारमधील सहज सत्तांतरापासून ते पश्चिम बंगालमधील तृणमूल आणि ममता बॅनर्जींच्या बालेकिल्ल्याचे अशक्यप्राय वाटणारे पतन, हे त्यांनी समोर आणले आहे. यामागे पक्षाला त्याचे पूर्वीचे वैभव परत मिळवून देण्याची त्यांची अथक मेहनत आणि दृढनिश्चय आहे.
नक्षलवाद, दहशतवाद मिटवण्यात यश
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे कौशल्य केवळ निवडणुका जिंकण्यापुरते मर्यादित नाही. देशाचे केंद्रीय गृहमंत्री म्हणून त्यांनी आपली प्रशासकीय क्षमताही सिद्ध केली आहे. त्यांच्या नियुक्तीपासून देशातील दहशतवादी घटना जवळजवळ इतिहासजमा झाल्या आहेत. एखादी दहशतवादी घटना घडल्यास, गुन्हेगारांना ओळखण्याचा आणि त्यांच्यावर कारवाई करण्याचा वेग वाढला आहे. देशातील नक्षलवादी समस्या समूळ नष्ट करून, त्यांनी आपली उद्दिष्ट्ये साध्य करण्यासाठी सातत्यपूर्ण आणि अथक परिश्रम दाखवून दिले आहेत.
दुसऱ्या पिढीचे नेते केले तयार
आपल्या सर्व कौशल्यांव्यतिरिक्त, त्यांनी भाजपला दुसऱ्या आणि तिसऱ्या पिढीचे नेतेही दिले आहेत, जे भाजपचे २०४७चे ध्येय पुढे नेतील. यामध्ये योगी आदित्यनाथ, सम्राट चौधरी, शुभेंदू अधिकारी आणि हिमंता बिस्वा सरमा यांचा समावेश आहे.
मध्य प्रदेशपासून पंजाबपर्यंत…
सर्वसाधारणपणे असे मानले जाते की, यशस्वी नेते सहसा दुसऱ्या आणि तिसऱ्या पिढीच्या नेत्यांना प्रोत्साहन देत नाहीत. परंतु, त्यांनी आपल्या गृहराज्य गुजरातपासून दिल्लीपर्यंत, मध्य प्रदेशपासून पंजाबपर्यंत अशा नेत्यांना ओळखण्याचे आणि त्यांना प्रोत्साहन देण्याचे काम केले, जे भाजपला त्याच्या सर्वोच्च शिखरावर नेण्याचा मोदी सरकारचा संकल्प पूर्ण करण्यास मदत करू शकतील.