
नवी दिल्ली : सध्या देशात भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार सत्तेवर आले आहे. देशातील एनडीए सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळात 3 कोटी घरे बांधण्याच्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या निर्णयावरून काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकास्त्र सोडले आहे. मोदींची ‘गॅरंटी’ पोकळ निघाल्याचे त्यांनी म्हटले आहे.
17 जुलै 2020 रोजी पंतप्रधानांनी देशाला ‘मोदींची गॅरंटी’ दिली होती की, 2022 पर्यंत प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर छत असेल. पण आता पंतप्रधान 3 कोटी घरे देण्याची बढाई मारत आहेत, जणू त्यांनी आधीची हमी पूर्ण केली आहे. मोदी सरकारला इतर लोकांच्या घरातून खुर्चा उधार घेऊन सत्तेचे ‘घर’ सांभाळावे लागले.
तसेच देशाला वास्तव माहिती आहे. मंत्रिमंडळाने 3 कोटी नवीन घरे बांधण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी या 3 कोटी घरांसाठी कोणतीही कालमर्यादा निश्चित करण्यात आलेली नाही, कारण भाजपने गेल्या 10 वर्षांत काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीएपेक्षा 1.2 कोटी कमी घरे बांधली आहेत.
खर्गे पुढे म्हणाले की, 2004 ते 2013 दरम्यान काँग्रेसने 4.5 कोटी घरे बांधली. तर 2014 ते 2024 या कालावधीत केवळ 3.3 कोटी घरे बांधता आली आहेत. जनतेने मोदींच्या गृहनिर्माण योजनेंतर्गत 49 लाख शहरी घरे म्हणजे 60% घरांसाठी बहुतेक पैसे स्वतःच्या खिशातून भरले आहेत. सरकारी मूलभूत शहरी घराची किंमत सरासरी 6.5 लाख रुपये आहे. त्यात केंद्र सरकार केवळ दीड लाख रुपये देते. यामध्ये राज्ये आणि नगरपालिकांचा वाटा 40% आहे. त्याचाही 60% भार जनतेने उचलला आहे, असेही त्यांनी सांगितले.