
दिल्ली : आपल्या देशामध्ये लोकसभा निवडणूक पार पडत आहे. शेवटच्या टप्प्यातील मतदान येत्या 1 जून रोजी पार पडणार असून त्यानंतर 4 जून रोजी लोकसभेचा निकाल लागणार आहे. यंदाच्या लोकसभा निवडणूकीच्या निकालाची उत्सुकता फक्त भारतामध्ये नसून इतर देशामध्ये देखील आहे. दरम्यान, पाकिस्तानचे माजी मंत्री फवाद चौधरी हुसैन यांनी नरेंद्र मोदी यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याची सर्वत्र चर्चा रंगली आहे. पाकिस्तानातील सर्वांची इच्छा आहे की नरेंद्र मोदी हरावेत असे पाकिस्तान-तेहरीक-ए-इंसाफ पार्टीचे नेते फवाद चौधरी हुसैन यांनी वक्तव्य केले आहे.
पाकिस्तानचे नेते फवाद चौधरी हुसैन अनेकदा भारताच्या राजकारणावर टिप्पणी करताना दिसत असतात. आता पुन्हा एकदा त्यांच्या वक्तव्याची चर्चा भारतामध्ये आणि पाकिस्तानामध्ये होत आहे. फवाद चौधरी म्हणाले की, “काश्मीर असो किंवा उर्वरित भारत, मुस्लिमांना सध्या कट्टरतावादी विचारसरणीचा सामना करावा लागत आहे. या सार्वत्रिक निवडणुकीत नरेंद्र मोदी हरणे हे खूप पाकिस्तानातही महत्त्वाचे आहे. तसेच नरेंद्र मोदींनी निवडणूक हरली पाहिजे, अशी प्रत्येक पाकिस्तानी व्यक्तीची इच्छा आहे. हा कट्टरतावाद पाकिस्तानातही आणि भारतातही कमी होईल तेव्हाच भारत आणि पाकिस्तानमधील संबंध सुधारतील,” असे मत पाकिस्तानातील नेत्याने मांडले आहे.
ते पुढे म्हणाले की, “पाकिस्तानमध्ये भारताविषयी द्वेष नाही, पण तिथे भाजप-आरएसएस पाकिस्तानबद्दल द्वेष निर्माण करत आहेत. द्वेष पसरवणाऱ्यांचा पराभव करणे हे आपले कर्तव्य आहे. भारतीय मतदारांसाठी पाकिस्तानशी संबंध सुधरलेले हेच फायदेशीर ठरणार आहे. भारत एक विकसित देश बनला आणि त्यामुळे नरेंद्र मोदी आणि त्यांच्या कट्टरवादी विचारसरणीचा निवडणुकीत पराभव झाला पाहिजे. त्यांना कोणीही पराभूत करील, मग ते राहुल गांधी, अरविंद केजरीवाल, ममता बॅनर्जी असोत, या सर्व लोकांना माझ्या शुभेच्छा आहेत,” असे वक्तव्य पाकिस्तानी नेते फवाद चौधरी हुसैन यांनी केले आहे. त्यांच्या वक्तव्याची चर्चा पाकिस्तानासह भारतामध्ये देखील होत आहे.