
West Bengal Politics, Mamata Banerjee, Trinamool Congress
West Bangal Politics : पश्चिम बंगालच्या राजकारणात पडद्यामागे मोठ्या उलथापालथी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यापासून राज्यातील राजकीय वातावरण सातत्याने बदलत चालले आहे. पक्षांतर्गत राजीनाम्यांमुळे पश सत्रामुळे पश्चिम बंगलाच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसले जणू धक्क्यांमागून धक्के बसू लागले आहेत. अशातच आता बंगालच्या राजकारणातून एक अत्यंत मोठी बातमी समोर येत असून, थेट ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना वगळून एक ‘नवीन तृणमूल काँग्रेस’ पक्ष स्थापन करण्याच्या हालचाली सुरू असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
पक्षांतर्गत असंतोष, बंडखोर नेत्यांच्या कारवाया आणि काही आमदारांच्या गुप्त बैठकांमुळे महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीची बंगालमध्ये पुनरावृत्ती होऊ शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
पक्षामधील कथित सही प्रकरणावरून (Signature Case) पक्षाविरुद्ध उघडपणे आवाज उठवल्यामुळे, म्हणजेच ‘व्हिसलब्लोअर’ (Whistleblower) भूमिका घेतल्यामुळे टीएमसीने आपल्या दोन आमदारांवर कडक कारवाई केली आहे. या प्रकरणी टीएमसीने ऋतब्रता बंदोपाध्याय आणि संदीपान साहा यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार या दोन्ही आमदारांना पक्षातून काढून टाकण्यात आल्यानंतर, ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांच्या नेतृत्त्वाला शह देण्यासाठी पक्षातूनच एका नव्या गटाची आणि नव्या पक्षाची बांधणी सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
या दोन आमदारांच्या हकालपट्टीमुळे टीएमसीमधील अंतर्गत धुसफूस आता पूर्णपणे चव्हाट्यावर आली आहे. निवडणुकांनंतर पक्षात सर्व काही सुरळीत चालले नसल्याचे या घडामोडींवरून स्पष्ट होत आहे. हकालपट्टी झालेले आमदार आणि पक्षातील काही नाराज गट एकत्र येऊन नवीन राजकीय पर्याय उभा करण्याच्या तयारीत असल्यामुळे, आगामी काळात ममता बॅनर्जी यांच्यासमोरील अडचणी वाढण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. या संभाव्य नव्या पक्षाच्या चर्चेमुळे संपूर्ण पश्चिम बंगालच्या राजकीय वर्तुळात सध्या प्रचंड खळबळ उडाली आहे.
सूत्रांच्या दाव्यानुसार, सुमारे १५ ते २० आमदार अशा नेत्यांच्या संपर्कात आहेत, जे पक्षात दबाव गट स्थापन करून नेतृत्वावर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, यापैकी कोणत्याही आमदाराने जाहीरपणे बंडाची घोषणा केलेली नाही.
बंगालमधील सध्याच्या घडामोडींची तुलना महाराष्ट्राच्या राजकारणाशी केली जात आहे. २०२२ मध्ये, एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बंड केले, ज्यामुळे शिवसेनेत मोठी फूट पडली. नंतर, शिंदे गटालाच खरी शिवसेना म्हणून मान्यता देण्यात आली.
त्यानंतर, अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (एनसीपी) फूट पाडून शरद पवार यांची पकड कमकुवत केली. दोन्ही प्रकरणांमध्ये, बंद दाराआडच्या बैठका, आमदारांमधील असंतोष आणि नेतृत्वाविरोधात वाढणाऱ्या नाराजीने परिस्थितीची सुरुवात झाली.
सध्या बंगालमध्येही अशाच प्रकारच्या चर्चांना उधाण आले आहे. टीएमसीमध्ये स्वतंत्र सत्ताकेंद्रांचा उदय आणि निवडणुकीतील पराभवानंतर नेत्यांमधील नाराजीने या अटकळींना आणखी खतपाणी घातले आहे.
राजकीय विश्लेषकांच्या मते, पश्चिम सध्या महाराष्ट्रासारख्या बंडाची शक्यता कमी आहे. याचे कारण म्हणजे सध्या तरी कोणत्याही मोठ्या गटाने नेतृत्वाला उघडपणे विरोध केलेला नाही. कोणत्याही फुटीसाठी मोठ्या संख्येने आमदार आणि संघटनात्मक नेत्यांच्या पाठिंब्याची आवश्यकता असेल.
तरीही, दोन आमदारांची हकालपट्टी, ममता बॅनर्जी यांनी पक्षात फूट पाडण्याचा प्रयत्न होत असल्याचा केलेला जाहीर आरोप आणि असंतोषाच्या बातम्यांचा सततचा ओघ, यावरून हे स्पष्टपणे दिसून येते की टीएमसी नेतृत्व हा धोका गांभीर्याने घेत आहे.
येत्या काही दिवसांत जर अधिक आमदारांनी बंडखोर नेत्यांना उघडपणे पाठिंबा दिला, तर पश्चिम बंगालच्या राजकारणात एक मोठे स्थित्यंतर पाहायला मिळू शकते. सध्या सर्वांचे लक्ष ममता बॅनर्जी यांच्या पुढील पावलांवर आणि पक्षांतर्गत सुरू असलेल्या गोंधळावर केंद्रित झाले आहे.