राजस्थान : देशभरात स्पर्धा परिक्षेसाठी शिक्षणाचे शहर म्हणून ओळखले जाणारे कोटा आता विद्यार्थ्यांचा आत्महत्येमुळे चर्चेत आले आहे. राजस्थानमधील कोटा शहरामध्ये दिवसेंदिवस विद्यार्थ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढत चालले आहे. दरम्यान, गुरुवारी एका विद्यार्थ्याने कीटकनाशक औषध खात आत्महत्या केली. त्याने वडिलांची माफी मागत परिक्षा नाही देऊ शकत अशा आशयाचे पत्र देखील लिहिले आहे.
परिक्षेच्या दबावामुळे कोटामध्ये परिक्षेची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्याने आत्महत्या केली आहे. अभिषेक कुमार असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. अभिषेक बिहारच्या भागलपूरचा रहिवासी होता आणि कोटा येथे जेईई मेनची तयारी करत होता. विद्यार्थी अभिषेक कुमार हा एका खाजगी कोचिंग संस्थेतून जेईई मेनची तयारी करत होता. हा विद्यार्थी गेल्या एक वर्षापासून कोटा येथील विज्ञान नगर पोलीस स्टेशन परिसरात तो पीजीमध्ये राहत होता. मृत विद्यार्थी अभिषेक याने कीटकनाशक औषध प्राशन करून आत्महत्या केली. विद्यार्थ्याच्या खोलीतून पोलिसांना सल्फा कीटकनाशकची बाटली सापडली आहे. विद्यार्थ्याच्या खोलीतून सुसाईड नोटही सापडली आहे.
‘सॉरी पप्पा, मी जेईई करू शकत नाही’
पोलिसांनी कोचिंग इन्स्टिट्यूटमधून चौकशी केली असता, अभिषेक 29 जानेवारीला पेपर देण्यासाठीही गेला नव्हता. त्यानंतर 19 फेब्रुवारीला त्याचा पेपरही होता, मात्र तोही विद्यार्थी पेपर देण्यासाठी गेला नाही. पोलिसांनी अभिषेकच्या खोलीतून एक सुसाईड नोटही जप्त केली आहे. सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे की, माफ करा बाबा मी जेईई करू शकत नाही. पोलिसांनी मृत विद्यार्थी अभिषेकचा मृतदेह रुग्णालयाच्या शवागारात ठेवला असून कुटुंबीयांना माहिती दिली आहे. कुटुंबीय आल्यानंतर अभिषेकच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करून पुढील कारवाई केली जाईल.






