
सात नव्या अमृत भारत एक्स्प्रेस धावणार
नवी दिल्ली : भारतीय रेल्वे देशभरातील रेल्वे कनेक्टिव्हिटी अधिक मजबूत करण्यासाठी सात नव्या अमृत भारत एक्स्प्रेस सुरू करण्याच्या तयारीत आहे. उत्तर, मध्य, पश्चिम आणि दक्षिण भारतातील प्रमुख शहरांना जोडणाऱ्या या गाड्यांमुळे प्रवाशांना वंदे भारतसदृश अधिक आरामदायी प्रवासाचा अनुभव तुलनेने किफायतशीर दरात मिळणार आहे.
प्रस्तावित अमृत भारत एक्स्प्रेसच्या मार्गांमध्ये धनबाद-कोईम्बतूर, प्रयागराज-मुंबई लोकमान्य टिळक टर्मिनस, प्रयागराज-उधना, सुबेदारगंज-मुंबई लोकमान्य टिळक टर्मिनस, गोरखपूर-दिल्ली, गोरखपूर-बांद्रा आणि चार्लापल्ली-गोरखपूर या सात मार्गांचा समावेश आहे. झारखंडमधील धनबादला तामिळनाडूतील कोईम्बतूरशी जोडणारी ही गाडी गया, प्रयागराज, जबलपूर, नागपूर, विजयवाडा आणि तिरुपती यांसारख्या प्रमुख शहरांमधून धावणार आहे.
प्रयागराज-लोकमान्य टिळक टर्मिनस ही रेल्वे इटारसी, भुसावळ आणि कल्याण ही प्रमुख स्थानके या मार्गावर असतील. प्रयागराज-उधना अमृत भारत एक्स्प्रेसमध्ये प्रयागराजला गुजरातमधील उधनाशी जोडणारी ही साप्ताहिक गाडी फतेहपूर, गोविंदपुरी, इटावा, तुंडला, आग्रा इदगाह, बयाना, हिण्डौन सिटी, गंगापूर सिटी, सवाई माधोपुर, कोटा, रामगंज मंडी, भवानी मंडी, रतलाम, वडोदरा आणि उधना या स्थानकांवर थांबणार आहे.
सुबेदारगंज- मुंबई लोकमान्य टिळक टर्मिनस
सुबेदारगंज ते मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस दरम्यान साप्ताहिक सेवा प्रस्तावित आहे. फतेहपूर, गोविंदपुरी, भरुआ सुमेरपूर, रागौल, बांदा, चित्रकूटधाम, कल्याण आणि ठाणे या शहरांना या गाडीचा लाभ होईल.
गोरखपूर-दिल्ली अमृत भारत एक्स्प्रेस
पूर्व उत्तर प्रदेशाला राजधानी दिल्लीशी जोडणाऱ्या या गाडीचा मार्ग खलीलाबाद, बस्ती, गोंडा, बुढवल, सीतापूर, बरेली, मुरादाबाद आणि गाझियाबादमार्गे असेल.
गोरखपूर-मुंबई बांद्रा अमृत भारत एक्स्प्रेस
गोरखपूरहून मुंबईपर्यंत धावणारी ही गाडी गोंडा, कानपूर सेंट्रल, आग्रा फोर्ट, कोटा, रतलाम, वडोदरा, सुरत, पालघर आणि बोरीवली या प्रमुख स्थानकांना जोडणार आहे.
चार्लापल्ली-गोरखपूर अमृत भारत एक्स्प्रेस
तेलंगणातील चार्लापल्ली आणि 10 गोरखपूरला जोडणारी ही गाडी पेडापल्ली, मंचेरियल, बल्लारशाह, चंद्रपूर, नागपूर, बैतूल, इटारसी, भोपाळ, बिना, वीरांगना लक्ष्मीबाई झाशी, लखनऊ सिटी, गोमतीनगर, बाराबंकी आणि गोंडा या मार्गावरून धावणार आहे.