मोठी बातमी! आता अहमदनगर नाही तर 'अहिल्यानगर' म्हणा; महाराष्ट्र सरकारच्या प्रस्तावाला केंद्राची मंजूरी
अहिल्यानगर: अहमदनगर जिल्हा आता ‘अहिल्यानगर’ या नावाने ओळखला जाणार आहे. राज्य सरकारने अहमदनगर जिल्ह्याचे नाव अहिल्यानगर करण्याचे आश्वासन दिले होते. आता राज्य सरकारच्या या प्रस्तावाला केंद्र सरकारने मंजूरी दिली आहे. या निर्णयामुळे अहमदनगर जिल्ह्यातील नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे. तसेच सरकारचे आभार देखील मानले आहेत. राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी ‘एक्स’ वर पोस्ट करत याबद्दल माहिती दिली आहे. राज्य सरकारने अहमदनगर जिल्ह्याचे नामकरण अहिल्यानगर करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला होता.
राज्य सरकारने याआधी औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याचे देखील अनुक्रमे छत्रपती संभाजीनगर आणि धाराशीव असे नामकरण केले आहे. त्यानंतर अहमदनगर जिल्ह्यातील नागरिकांनी देखील या जिल्ह्याचे नाव अहिल्यानगर करावे अशी मागणी केली होती. गेल्या वर्षी चोंडी या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीदिनी अहमदनगर जिल्ह्याचे नाव बदलण्याची घोषणा केली होती. दरम्यान अहमदनगरचे अहिल्यानगर झाल्यानंतर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केंद्र सरकारचे आभार मानले आहेत.
अहील्यानगर नामांतराची वचनपूर्ती!!!
नगर जिल्ह्याचे नामांतर अहील्यानगर करण्याच्या प्रस्तावाला केंद्र सरकारने मंजूरी दिली.आज मंत्रीमंडळाच्या बैठकीत जिल्ह्याचे नामकरण अहील्यानगर करण्यास मान्यता मिळाल्याने वचनपूर्ती झाल्याचा मनस्वी आनंद आहे.
निर्णय होण्याकरीता सहकार्य करणारे…— Radhakrishna Vikhe Patil (@RVikhePatil) October 4, 2024
काय म्हणाले महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील?
राधाकृष्ण विखे पाटील यांनी ट्वीट करत केंद्र सरकारचे आभार मानले आहेत. विखे पाटील म्हणाले, ”अहील्यानगर नामांतराची वचनपूर्ती!!! नगर जिल्ह्याचे नामांतर अहील्यानगर करण्याच्या प्रस्तावाला केंद्र सरकारने मंजूरी दिली.आज मंत्रीमंडळाच्या बैठकीत जिल्ह्याचे नामकरण अहील्यानगर करण्यास मान्यता मिळाल्याने वचनपूर्ती झाल्याचा मनस्वी आनंद आहे. निर्णय होण्याकरीता सहकार्य करणारे विश्वनेते पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचे मनापासून आभार.”
रेल्वे स्थानकाचेही नाव बदलण्यात येणार
अहमदनगर जिल्ह्याचे नामकरण अहिल्यानगर असे करण्यात आले आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर केंद्र सरकारने या प्रस्तावाला मंजूरी दिली आहे. त्यानंतर आता अहमदनगर रेल्वे स्थानकाचे देखील नाव बदलण्यात येणार आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी याबद्दल घोषणा केली होती.