राज्यात मुसळधार पाऊस
पुणे : मागील दोन-तीन दिवसांपासून मुंबई, ठाणे, पुण्यासह राज्यातील अनेक भागांत मुसळधार पाऊस होताना दिसत आहे. या मुसळधार पावसामुळे जनजीवन अक्षरश: विस्कळीत झाले आहे. सध्या पुण्यासह मुंबई, ठाणे, पालघर या जिल्ह्यांमध्ये पाऊस सुरूच असून, अनेक भागांमध्ये पाणी साचलं आहे. हवामान विभागाकडून महाराष्ट्रात पुढील 24 तासांसाठी मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर आणि रायगड या पाच जिल्ह्यांना पावसाचा ‘रेड अलर्ट’ देण्यात आला आहे.
पुण्यातही पावसाची संततधार सुरु आहे. घराबाहेर जाणेही कठीण बनले आहे. तसेच मुंबई, ठाणे, पालघर या जिल्ह्यांमध्ये पाऊस सुरूच असून, अनेक भागांमध्ये पाणी साचलं आहे. याचा मोठा परिणाम हा मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकल ट्रेनवर झाला असून, लोकलच वेळापत्रक कोलमडल्याचं पाहायला मिळत आहे, याचा मोठा फटका हा चाकरमान्यांना बसला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गडचिरोली या जिल्ह्यासह कोल्हापूर घाट परिसरात पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. अतिवृष्टीच्या अंदाजानुसार, आपत्कालीन परिस्थितीत सर्व जिल्हा प्रशासनांना अधिक सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
याशिवाय, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात देखील जोरदार पाऊस झाला आहे. या पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान झालं आहे. सोयाबीन, कापूस या सारख्या पिकांना या पावसाचा प्रचंड फटका बसला असून, शेतात पाणी साचल्यानं शेतकरी हवालदिल झाले आहेत. पुढील 24 तासांमध्ये हवामान विभागाकडून राज्यातील अनेक भागांमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.
काय सांगतो आजचा अंदाज?
हवामान विभागाकडून महाराष्ट्रात पुढील 24 तासांसाठी मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर आणि रायगड या पाच जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर रत्नागिरी जिल्ह्यातील जगबुडी, शास्त्री, कोदवली, रायगड जिल्ह्यातील कुंडलिका नदी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गड नदी, वाघोटण नदी या नद्यांनी इशारा पातळी ओलांडली आहे. नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
कोकण किनारपट्टीवर उंच लाटांचा इशारा
भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्राकडूनही इशारा देण्यात आला आहे. मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये उंच लाटा उसळणार असल्याचे सांगण्यात आले आहे. पुढील 24 तासांमध्ये समुद्रात 3.5 ते 4.3 मीटर एवढ्या उंच लाट उसळणार असल्याचा अंदाज आहे.