
ठाण्यात पावसाचा कहर! मद्रास चाळीची गॅलरी कोसळली; १० वर्षीय मुलाचा मृत्यू, महिला व बालक जखमी
मिळालेल्या माहितीनुसार, आझाद नगर येथील सुमारे २५ ते ३० वर्षे जुन्या मद्रास चाळीतील पहिल्या मजल्यावरील गॅलरीचा काही भाग अचानक कोसळला. या दुर्घटनेत जयकुमार जयस्वाल (वय १०) हा ढिगाऱ्याखाली अडकला. त्याला तातडीने बाहेर काढून सिव्हिल रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
या दुर्घटनेत उर्मिला जयस्वाल (वय ३०) आणि विनीतकुमार जयस्वाल (वय ८) हे जखमी झाले आहेत. स्थानिक नागरिक, अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या मदतीने दोघांनाही ढिगाऱ्यातून बाहेर काढून खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. या घटनेची माहिती मिळताच ठाणे अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन विभाग, प्रभाग समितीचे अधिकारी आणि स्थानिक लोकप्रतिनिधी घटनास्थळी दाखल झाले. परिसराची पाहणी करून इमारतीच्या उर्वरित भागाची सुरक्षितता तपासण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
प्राथमिक माहितीनुसार, सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे इमारतीच्या गॅलरीचा भाग कमकुवत होऊन कोसळल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या दुर्घटनेनंतर परिसरातील जुन्या आणि धोकादायक इमारतींची तातडीने तपासणी करून आवश्यक ती उपाययोजना करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. दरम्यान, या घटनेचा अधिक तपास सुरू असून दुर्घटनेमागील नेमके कारण शोधण्याचे काम प्रशासनाकडून सुरू आहे.
याच दरम्यान, गेल्या आठवड्यात पावसाशी संबंधित घटनांमध्ये तीन जणांचा मृत्यू झाला असून, सुमारे ८०० जणांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. हवामानाशी संबंधित ताज्या घटनेत, वीज पडून दोन जण जखमी झाले. जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, मृत झालेले तिघेही ठाणे शहर, अंबरनाथ आणि मीरा-भयंदर येथील रहिवासी होते. या पावसाळ्यात पावसाशी संबंधित विविध घटनांमध्ये एकूण ११ जण जखमी झाले आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. तहसीलदार अभिजीत देशमुख यांनी सांगितले की, बुधवारी मुरबाड तालुक्यात एका किशोरवयीन मुलीसह दोन जण वीज पडून जखमी झाले. दोघांनाही तातडीने टोकावडे प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले, जिथे त्यांच्यावर उपचार सुरू असून ते धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात आले आहे.