
पाणीपुरवठा योजनेवरून विरोधकांकडून जनतेची दिशाभूल
नगरसेवक विजय धट यांचा आरोप
ही योजना पूर्णच झालेली नसताना आरोप करणे चुकीचे
म्हसवड: म्हसवड शहराच्या वाढीव पाणीपुरवठा योजनेसाठी राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी निधी आणला असून ही योजना यशस्वी करण्यासाठी त्यांचे विशेष लक्ष आहे. त्यांच्या प्रतिमेला धक्का पोहोचणार नाही, अशा दर्जेदार पद्धतीने या योजनेचे काम व्हावे यासाठी सर्व नगरसेवक आणि नगराध्यक्ष सातत्याने पाठपुरावा करत आहेत. असे असताना विरोधकांकडून विनाकारण उपोषणाचे नाट्य करून जनतेची दिशाभूल करण्याचा आणि प्रशासनाला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे. अद्याप ही योजना पूर्णच झालेली नसताना कामाचा दर्जा चांगला नाही, असा आरोप करणे चुकीचे असल्याचे मत म्हसवडचे नगरसेवक विजय धट यांनी पत्रकार परिषदेत मांडले.
म्हसवड पाणीपुरवठा योजनेवरून प्रशासनाच्या विरोधात दोन दिवस उपोषण करून सर्वसामान्य जनतेची दिशाभूल करण्यात आल्याचा आरोप सत्ताधारी गटाकडून करण्यात आला आहे. योजनेचे काम अंतिम टप्प्यात आले असून सर्व काम नियमानुसारच सुरू आहे. केवळ लक्ष वेधून घेण्यासाठी विरोधकांनी उपोषणाचे नाटक केल्याचा पुनरुच्चार सत्ताधारी गटाने केला.
ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी शहराचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी केंद्र शासनाच्या अमृत २.० योजने अंतर्गत विशेष निधी आणला असून राज्य शासनाकडूनही त्यासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. या योजनेसाठी ८९ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. योजनेचे काम आता अंतिम टप्प्यात आले असून पुढील काही दिवसांत म्हसवडकरांसह मंत्री गोरे यांनी पाहिलेले स्वप्न सत्यात उतरणार आहे.
विरोधक प्रशासनावर भ्रष्टाचाराचे आरोप करून योजनेत गैरव्यवहार झाल्याचा कांगावा करत आहेत. मात्र, या योजनेसाठी मंत्री गोरे यांनी अपार मेहनत घेतली आहे. पुढील ३० वर्षे या योजनेसाठी पुन्हा निधी मिळणार नाही, त्यामुळे काम अधिक दर्जेदार झाले पाहिजे, हेच आमचेही मत आहे आणि म्हणूनच आम्ही कामावर सतत लक्ष ठेवून आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले. योजना पूर्ण झाल्यानंतर पुढील दोन वर्षे ती संबंधित ठेकेदाराकडून चालवली जाणार आहे; त्यानंतरच ही योजना पूर्णपणे यशस्वी झाली की नाही हे स्पष्ट होईल.
पश्चिम महाराष्ट्र आता भाजपचा बालेकिल्ला; जयकुमार गोरे यांचा दावा, आगामी निवडणुकांसाठी संघटन मजबूत
या योजनेसाठी शहरात नवीन जलवाहिनी टाकण्यात आली असून त्यासाठी रस्ते खोदण्यात आले आहेत. योजना पूर्ण झाल्यावर रस्त्यांची दुरुस्ती केली जाणार आहे. याबाबत सर्वसामान्य जनतेला कल्पना देण्यात आली असून त्यांची कोणतीही तक्रार नाही. त्यामुळे विनाकारण प्रशासनाला बदनाम करून लक्ष वेधण्याचा केविलवाणा प्रयत्न विरोधकांनी थांबवावा, असे आवाहन सत्ताधारी गटाकडून करण्यात आले.
या पत्रकार परिषदेस नगराध्यक्षा पूजा विरकर, उपनगराध्यक्षा श्रीदेवी पिसे, सविता मासाळ, विजय बनगर, अभिषेक विरकर आणि अकील काझी आदी उपस्थित होते.