उन्हामुळे सतत डोकेदुखीचा त्रास होतो? मग पेनकिलरच्या गोळ्या घेण्याऐवजी करून पहा 'हे' घरगुती उपाय
उन्हाळ्यात वारंवार डोकं का दुखत?
डोकेदुखीच्या त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी उपाय?
कडक उन्हाळ्यात आरोग्याची कशी काळजी घ्यावी?
उन्हाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर आरोग्यासंबंधित गंभीर समस्या उद्भवू शकतात. वाढत्या उष्णतेमुळे अपचनाच्या त्रासासोबतच डोकेदुखीची समस्या उद्भवते. उन्हात कुठेही बाहेर जाऊन आल्यानंतर खूप जास्त थकल्यासारखे वाटते. घामावाटे शरीरातील पाणी बाहेर पडून गेल्यानंतर खूप जास्त अशक्तपणा येतो आणि खूप जास्त थकल्यासारखे वाटते. या दिवसांमध्ये कष्टाची कामे जास्त वेळ केल्यास शरीरसंबंधित गंभीर समस्या उद्भवू लागतात. डिहायड्रेशन, थकवा, अशक्तपणा वाढल्यानंतर काहीवेळा डोकेदुखीची समस्या उद्भवते. त्यामुळे उन्हाळ्यात वाढलेल्या डोकेदुखीच्या त्रासाकडे दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करावेत. डोकेदुखीची समस्या उद्भवल्यानंतर अनेक लोक मेडिकलमध्ये जाऊन पेनकिलरच्या गोळ्या घेतात. पण पेनकिलरच्या गोळ्या खाल्ल्यामुळे किडनीवर परिणाम होण्याची जास्त शक्यता असते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला डोकेदुखीच्या त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी कोणते घरगुती उपाय करावेत, याबद्दल जाणून घेऊया सविस्तर माहिती.(फोटो सौजन्य – istock)
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये डोकेदुखीचा त्रास सगळ्यांचं होतो. शरीरात पाण्याची कमतरता निर्माण झाल्यामुळे डोकेदुखीची समस्या उद्भवते. सतत डोकं दुखल्यामुळे खूप जास्त चिडचिड आणि थकवा आल्यासारखे वाटते. त्यामुळे दिवसभरात शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी भरपूर पाणी प्यावे. पाणी प्यायल्यामुळे शरीरात वाढलेली उष्णता कमी होण्यास मदत होते आणि डोकेदुखीच्या त्रासापासून सुटका मिळते. पाण्यासोबतच ताक, लिंबूपाणी, नारळपाणी यांसारख्या शरीर थंड ठेवणाऱ्या पेयांचे सेवन करावे. या पेयांच्या सेवनामुळे शरीरात वाढलेली उष्णता कमी होते आणि आरोग्य सुधारते. शरीरातील पाण्याची पातळी कमी झाल्यानंतर मेंदूवर जास्तीचा तणाव येतो. यामुळे डोकं दुखण्यास सुरुवात होते. त्यामुळे शरीर हायड्रेट ठेवणे फार आवश्यक आहे.
डोकेदुखी वाढल्यास कपाळावर थंड पट्टी ठेवावी. थंड पाण्यात रुमाल भिजवून त्यातील पाणी काढून कपाळावर थंड पट्टी ठेवावी. यामुळे शरीराचे वाढलेले तापमान कमी होण्यास मदत होते. तसेच डोक्यावर थंडावा टिकवून ठेवण्यासाठी गुलाब पाणी किंवा चंदनाचा लेप कपाळावर लावावा. यामुळे डोकेदुखीच्या वेदना कमी होण्यास मदत होते. तसेच डोकं दुखल्यानंतर कायमच पेनकिलरच्या गोळ्या खाणे गरजेचे नाही. त्याऐवजी तेल कोमट गरम करून डोक्यावर हलक्या हाताने मसाज करावा. मसाज केल्यामुळे रक्तभिसरण सुधारण्यास मदत होईल. याशिवाय खूप जास्त डोकेदुखी वाढल्यास गरम वातावरणात काहीवेळ शांत, थंड जागेत बसून डोळे बंद करून शांत विश्रांती घ्यावी.
तोंडातील जखमेकडे दुर्लक्ष नको; ‘ही’ आहेत Head Neck Cancer ची सुरुवातीची लक्षणे
दैनंदिन आहाराचा थेट परिणाम शरीरावर होतो. आहारात तिखट आणि तेलकट पदार्थांचे अतिसेवन केल्यामुळे अपचनाची समस्या उद्भवते. खाल्लेले अन्नपदार्थ व्यवस्थित पचन न झाल्यामुळे डोकेदुखी किंवा उलट्या, मळमळ होऊन आरोग्य बिघडून जाते. त्यामुळे उन्हाळ्यासह इतर सर्वच ऋतूंमध्ये पचनास हलके आणि शरीराला थंडावा देणाऱ्या पदार्थांचे सेवन करावे. आहारात काकडी, कलिंगड, हंगामी फळे आणि पालेभाज्यांचा समावेश करावा. याशिवाय कडक उन्हात कुठेही बाहेर जाताना टोपी, स्कार्फ किंवा छत्रीचा वापर केल्यास सूर्याच्या झळांपासून बचाव होईल.






