
बाटलीतल्या पाण्याच्या चवीवरुन त्या पाण्याच्या बाटलीची गुणवत्ता कळते. बऱ्याचदा असं होतं की, स्टीलच्या बाटलीतून पाणी पिताना धातूसारखी पाण्याची चव लागते किंवा पाण्याला वास येतो. याचं कारण म्हणजे पाण्याच्या बाटलीची खराब गुणवत्ता. स्टेनलेस स्टीलच्या पाण्याची बाटली वापरताना त्याची गुणवत्ता जाणून घेणं देखील तितकंच महत्वाचं आहे. या बाटल्यांचं स्टील कमी दर्जाचं असल्याने याची चव बदलते. यामुळे होतं काय तर धातुसारखी चव पाण्यात उतरते. सर्व स्टेनलेस स्टीलचा दर्जा सारखा नसतो. जाणकारांच्या मते, ३०४ किंवा ३१६ ग्रेड स्टेनलेस स्टील पिण्याच्या पाण्यासाठी योग्य आहे. हे ग्रेड गंज आणि रासायनिक प्रतिक्रियांपासून अधिक सुरक्षित असतात, त्यामुळे त्यातून पाण्यात कोणतेही घटक मिसळण्याची शक्यता कमी असते.
स्वस्त किंवा कमी दर्जाच्या बाटल्यांमध्ये वापरलेले स्टील ओलावा, उष्णता किंवा आम्लीय पेय (जसे लिंबूपाणी) यांच्या संपर्कात आल्यावर हलकी रासायनिक प्रतिक्रिया देऊ शकते. त्यामुळे पाण्याची चव बदलू शकते. तसं पाहायला गेलं तर स्टेनलेस स्टीलच्या बाटल्या आरोग्यासाठी सुरक्षित मानल्या जातात. स्टेनलेस स्टीलमध्ये क्रोमियम आणि निकेल यांसारखी धातू असतात, जे गंज रोखतात आणि पाण्यात मिसळत नाहीत. त्यामुळे साधारणपणे स्टीलच्या बाटलीतलं पाणी पिणं सुरक्षित असतं.तरीही कधी कधी पाण्याची चव वेगळी लागण्याची काही कारणं असू शकतात. उदाहरणार्थ, नवीन बाटली नीट धुतली नसल्यास त्यावर कारखान्यातील रसायनांचे अंश राहू शकतात. तसेच, जर बाटली बराच काळ स्वच्छ न करता वापरली तर आतमध्ये बॅक्टेरिया किंवा दुर्गंधी निर्माण होऊन पाण्याची चव बदलू शकते.काही वेळा पाण्यातील खनिजे आणि स्टील यांच्यातील सूक्ष्म प्रतिक्रिया देखील चव बदलण्यास कारणीभूत ठरू शकते. विशेषतः गरम पाणी किंवा लिंबूपाणी दीर्घकाळ ठेवले तर धातूसारखी चव जाणवू शकते.
स्टीलची बाटली सुरक्षित ठेवण्यासाठी काही सोप्या गोष्टी लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे. दररोज बाटली स्वच्छ धुणं, आठवड्यातून एकदा गरम पाणी आणि बेकिंग सोड्याने साफ करणं, तसेच आम्लयुक्त जसं लिंबूपाणी दीर्घकाळ ठेवू नयेत. एकंदरीत, चांगल्या दर्जाची फूड-ग्रेड स्टेनलेस स्टील बाटली वापरली आणि तिची योग्य स्वच्छता ठेवली तर ती आरोग्यासाठी पूर्णपणे सुरक्षित ठरते. त्यामुळे पाण्याची चव थोडी वेगळी वाटली तरी घाबरण्याचं कारण नसतं; फक्त बाटलीची स्वच्छता आणि गुणवत्ता तपासणं गरजेचं आहे.