फोटो सौजन्य - Social Media
छत्रपती शिवाजी महाराज हे नाव म्हणजे मराठी माणसाचे हृदयच! देवासमान असणारी ही प्रतिमा, प्रत्येक मराठी माणसाचं हृदय आहे. शिवजयंती हा महाराष्ट्राच्या मातीतला सर्वात मोठ्या सणांपैकी एक सण! राज्यभरात जल्लोषाचे वातावरण असणार आहे.जर तुम्हाला या दिवशी मुंबईच्या जवळील काही किल्ल्यांना भेट देऊन, १९ फेब्रुवारी म्हणजेच शिवजयंती साजरी करायची आहे, तर या किल्ल्यांना नक्की भेट द्या.
माहुली किल्ला
ठाणे जिल्ह्यातील हा किल्ला ट्रेकिंगसाठी प्रसिद्ध आहे. सह्याद्रीच्या कुशीत वसलेला माहुली निसर्गसौंदर्य आणि इतिहास यांचा सुंदर संगम दाखवतो.
विसापूर
लोणावळ्याजवळील हा भव्य किल्ला पावसाळी ट्रेकसाठी प्रसिद्ध असला तरी शिवजयंतीलाही येथे मोठी गर्दी होते. विशाल तटबंदी आणि तोफा पाहण्यासारख्या आहेत.
खांदेरी-उंदेरी
अरबी समुद्रातील हे जलदुर्ग शिवकालीन सागरी सामर्थ्याची साक्ष देतात. बोटीने जाऊन येथे शिवजयंती साजरी करण्याचा अनुभव वेगळाच असतो.
कुलाबा
अलिबाग किनाऱ्यालगत असलेला हा सागरी किल्ला भरती-ओहोटीच्या वेळी पायीही गाठता येतो. येथे शिवप्रतिमेसमोर अभिवादन करताना अभिमानाची भावना दाटून येते.
रायगड
शिवरायांची राजधानी! इथले राजसभागृह, मेघडंबरी आणि समाधीस्थळ प्रत्येक शिवभक्तासाठी पवित्र आहे. शिवजयंतीला येथे भव्य कार्यक्रम होतात.
शिवनेरी
शिवाजी महाराजांचे जन्मस्थान. शिवजयंतीला येथे विशेष सोहळे आणि ऐतिहासिक कार्यक्रम आयोजित केले जातात.
सिंहगड
तानाजी मालुसरे यांच्या शौर्याची साक्ष देणारा हा किल्ला देशभक्तीची जाणीव करून देतो. पहाटेचा सूर्य आणि ‘गड आला पण सिंह गेला’ची आठवण मन भारावून टाकते.
सुवर्णदुर्ग
कोकण किनाऱ्यावरील हा भव्य जलदुर्ग सागरी संरक्षण व्यवस्थेचे उत्कृष्ट उदाहरण आहे. सुवर्णदुर्ग दापोलीतील हर्णे गावाजवळ स्थित आहे.
मुरुड जंजिरा
समुद्रात अभेद्य उभा असलेला हा किल्ला स्थापत्यकलेचा अनोखा नमुना आहे. इतिहासप्रेमींसाठी अविस्मरणीय अनुभव देणारे ठिकाण.
या सर्व किल्ल्यांवर शिवजयंतीचा उत्साह असतो. स्वराज्याची राजधानी रायगड किल्ला आणि छत्रपती शिवरायांचे जन्मस्थळ शिवनेरी या दोन किल्ल्यांवर थाटात शिवजयंती साजरी केली जाते. मुंबईच्या जवळील या किल्ल्यांना शिवजयंतीच्या मुहूर्तावर नक्की भेट द्या.






