
क्षयरोग निदानाचा वेग वाढला! २०२१ पासून शोधमोहीम, रुग्णसंख्येत वाढ मात्र पॉझिटिव्हिटी दरात घट
‘टीबी मुक्त भारत’ अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्याने क्षयरोग (टीबी) निर्मूलनाच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. गेल्या पाच वर्षांतील आकडेवारी पाहता, राज्यात संशयित क्षयरुग्णांच्या तपासणीचे (स्क्रीनिंग) प्रमाण तब्बल पाचपटीने वाढले असून, त्या तुलनेत प्रत्यक्ष रुग्ण आढळण्याचे प्रमाण (पॉझिटिव्हिटी रेट) मात्र लक्षणीयरीत्या खाली आले आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने २०२१ पासून क्षयरोग शोध मोहिमेला मोठी गती दिली आहे. २०२१ मध्ये जिथे केवळ ९ लाख ५४ हजार संशयितांची तपासणी झाली होती, ती २०२५ पर्यंत ४५ लाख ७१ हजारांच्या पार गेली आहे. जास्तीत जास्त संशयितांची चाचणी करून त्यांना उपचारांच्या कक्षेत आणणे, हे या मोहिमेचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे दिसून येते.(फोटो सौजन्य – istock)
२०२१ मध्ये तपासणी केलेल्या संशयितांपैकी २०.९८ टक्के लोक क्षयरोगग्रस्त आढळत होते. मात्र, २०२५ मध्ये हेच प्रमाण अवघ्या ४.७५ टक्क्यांवर आले आहे. जरी एकूण रुग्णसंख्या २ लाखांच्या आसपास स्थिर दिसत असली, तरी व्यापक तपासणीमुळे आता अगदी सुरुवातीच्या टप्प्यात रुग्ण शोधणे सोपे झाले असल्याचे सार्वजनिक आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.
पूर्वी क्षयरुग्ण निदानाविना राहत असत, जे समाजासाठी धोकादायक होते. आता ४५ लाखांहून अधिक लोकांचे संक्रनिंग होत असल्याने ‘लपलेले’ रुग्ण समोर येत आहेत. स्क्रीनिंग १० लाखांनी वाढले असून राज्य आता टीबी निर्मूलनाच्या अंतिम टप्प्याकडे वाटचाल करत असल्याचे आकडे सांगतात.
मेंदूच्या पेशी दीर्घकाळ राहतील मजबूत आणि तीक्ष्ण! रोजच्या आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश
मागील ५ वर्षात संशयित क्षयरुग्ण शोधण्यासाठी सर्वेक्षण आणि स्क्रीनिंगचे प्रमाण वाढवण्यात आले असुंत रुग्णसंख्या वाढलेली दिसत असली, तरी स्क्रीनिंगच्या तुलनेत रुग्णांच्या प्रमाणाची टक्केवारी कमी होणे हे सकारात्मक लक्षण आहे. जनजागृतीतून लोक सहभाग ही वाढत आहे, अशी माहिती -डॉ. कैलास बाविस्कर, उपसंचालक, सार्वजनिक आरोग्य विभाग, यांनी दिली आहे.