एसटी बसचा प्रवास आणखी सुकर होणार; तब्बल 3000 नव्या स्मार्ट बसेस रस्त्यावर धावणार(फोटो - सोशल मीडिया)
मुंबई : एसटी बसच्या प्रवासाला सर्वच वर्गातील प्रवाशांकडून प्रतिसाद मिळत आहे. त्यात शासकीय योजनांमुळे प्रवासी संख्येत वाढ होताना दिसत आहे. असे असताना आता राज्याच्या सार्वजनिक परिवहन व्यवस्थेत मोठा बदल घडवणारा महत्त्वाचा निर्णय राज्य परिवहन महामंडळाने घेतला आहे. एसटीच्या ताफ्यात तब्बल ३००० नवीन अत्याधुनिक बस दाखल होत आहेत. या स्मार्ट बसचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे.
‘राजमाता जिजाऊ’ असे या नव्या बसना नाव देण्यात आले आहे. राजमाता जिजाऊ यांच्या स्मरणार्थ हे नाव देण्यात आले असून, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या घडणीत जिजाऊंचे योगदान अधोरेखित करण्याचा उद्देश आहे. नवीन बसमध्ये प्रवाशांच्या सोयीसाठी अनेक आधुनिक सुविधा देण्यात आल्या आहेत. एसटी महामंडळाने याआधी ‘शिवनेरी’, ‘शिवशाही’, ‘शिवाई’, ‘यशवंती’ आणि ‘हिरकणी’ अशा विविध नावांनी बस सेवा सुरू केली आहे.
आता ‘राजमाता जिजाऊ’ या नव्या नावामुळे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाचा गौरव अधिक समृद्ध झाला असल्याचे परिवहन मंत्री सरनाईक यांनी सांगितले. या नव्या बसमुळे राज्यातील प्रवाशांना अधिक सुरक्षित, सुसज्ज आणि आधुनिक प्रवासाचा अनुभव मिळणार आहे.
56 आसन व्यवस्था असणार
या बसमध्ये विशिष्ठ आसनरचना असणार आहे. एकूण ५६ आसने असतील. सध्याच्या एसटी बसमध्ये ४० आसने असतात, त्यामुळे या बसमध्ये १६ अतिरिक्त आसनांची सुविधा मिळणार आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी ४ सीसीटीव्ही कॅमेरे, जीपीएस प्रणाली, पॅनिक बटण, पब्लिक अनाउन्समेंट सिस्टीम आणि इलेक्ट्रॉनिक मार्गफलक बसवण्यात आले आहेत.
प्रवास सुरक्षित अन् आरामदायी होणार
या बस प्रामुख्याने शहरांदरम्यान शटल सेवेसाठी वापरण्यात येणार असून, जास्त गर्दीच्या मार्गांवर त्यांची धावपट्टी असेल. त्यामुळे प्रवास अधिक जलद, सुरक्षित आणि आरामदायी होणार आहे. सुरुवातीला या बस नागपूरमध्ये सुरू केल्या जाणार असून, पहिल्या टप्प्यात ५० बस सेवेत दाखल होतील.
हेदेखील वाचा : Mumbai Metro 9 : काशिगाव मेट्रो स्थानक सज्ज, लवकरच मिरा-भाईंदरकरांचा प्रवास होणार आरामदायी






