
संजय राऊतांमध्ये हिंमत असेल तर...; भाजप नेत्याने दिले आव्हान
मुंबई : मराठी भाषा गौरव दिनी मराठी भाषेचा ‘उदो उदो’ करायचा आणि शाळांमध्ये पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीचा निर्णय घ्यायचा, मराठी माणसाला हद्दपार करायचे, मराठी माणसाचा अपमान करायचा आणि अश्लील शिव्या देऊन मराठी भाषेचा अवमान करायचा हे पाप संजय राऊत, उद्धव ठाकरे आणि उबाठा गटाने केले आहे. त्यामुळे यांचे मराठी भाषा प्रेम म्हणजे पुतना मावशीच्या पान्ह्यासारखे आहे, अशी टीका भारतीय जनता पार्टीचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी केली आहे. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
बन म्हणाले की, खऱ्या अर्थाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळेच मराठी भाषेला सन्मान आणि अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. त्रिभाषा सूत्रामध्ये कुठेही मराठी भाषेला डावलण्यात आलेले नाही. पहिली पासूनची हिंदी भाषेची सक्ती काढून टाकत महाराष्ट्रात मराठी भाषा सक्तीची केली आणि हिंदी भाषेला पर्यायी भाषा म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता देण्याचा निर्णय घेतला. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये पहिल्यांदा मराठीचे विद्यापीठ सुरू झाले. राऊत आणि उबाठा गटाचे मराठी भाषेसंदर्भातील योगदान काय आहे हे राऊतांनी सांगावे. इंग्रजी आणि हिंदी पहिल्या इयत्तेपासून सक्तीची करावी ही शिफारस उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळाने स्वीकारली होती त्याबाबत हिंमत असेल तर राऊतांनी उद्धव ठाकरे यांना जाब विचारावा, असे आव्हान बन यांनी दिले.
उबाठा गटाच्या नेत्यांची मुले नेमकी कुठल्या माध्यमाच्या शाळांमध्ये शिकली यांचे उत्तर राऊतांनी महाराष्ट्राला द्यावे असेही ते म्हणाले. महापालिकेमध्ये महाविकास आघाडीचे सरकार असताना राऊतांना ना मराठी, ना हिंदी, ना इंग्रजी कळत होती. त्यांना केवळ ‘अपना सपना मनी मनी’ हीच भाषा कळत होती असा टोमणा बन यांनी मारला.
बन म्हणाले की, मुंबई महापालिकेमध्ये उद्धव ठाकरे यांचे सरकार असताना कंत्राटदारांची भाषा मराठी होती की गुजराती होती की केवळ पैशांची होती हे राऊतांनी एकदा संदीप देशपांडेंना विचारावे, असा टोला त्यांनी लगावला. देशपांडे यांनी याबाबत पोलखोल केली आहे, असेही त्यांनी नमूद केले.
अजितदादांच्या विमान अपघात चौकशीबाबत काल सीआयडीने पत्रकार परिषद घेत त्या विमान अपघाताचा तपास कसा सुरु आहे, आतापर्यंत या तपासात काय काय समोर आले, या तपासाची सद्यस्थिती काय, हे स्पष्टपणे सांगितले. आता अजितदादांचा वारसा आपण चालवावा ही सूप्त इच्छा मनात असलेल्या रोहित पवारांनी संशयकल्लोळ नाटक बंद त्वरित करावे, असे बन यांनी पुन्हा एकदा खडसावले.
हे सुद्धा वाचा : आमदार सदाभाऊ खोत यांनी घेतली मंत्री विखे पाटलांची भेट; केली ‘ही’ मोठी मागणी