
फडणवीसांच्या टीकेवर CJP च्या अभिजित दीपकेंचा पलटवार
काल (शनिवार, ६ जून) दिल्लीतील जंतर मंतर येथे पार पडलेल्या कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाला संपूर्ण देशभरातून मोठा पाठिंबा मिळाला. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी यावेळी आंदोलकांकडून करण्यात आली. सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असलेल्या ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या (Cockroach Janta Party) जंतरमंतरवरील आंदोलनाला (Protest) आता सर्वच स्तरावरून मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळाल्याचे दिसले. राजकीय स्तरावरही अनेक राजकीय नेत्यांनी या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला. अश्यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल या आंदोलनावर टीका करत आंदोलकांना “अराजकतावादी’ म्हंटले होते. यावरूनच आता कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेत जोरदार टीका केली. “जय भीमच्या घोषणा देणे, आंबेडकरांचे पुस्तक घेऊन चालणे हि अराजकता आहे का?” असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.
मुख्यमंत्री फडणवीसांच्या ‘अराजकतावादी’ टीकेला प्रत्युत्तर देत अभिजित दिपके म्हणाले, “मी आंबेडकरांचं पुस्तक घेऊन गेलो होतो, जे आंबेडकरांना फॉलो करतात ते अराजक असतात, जय भीमच्या घोषणा अराजकता आहे का? फडणवीस जे आपले मुख्यमंत्री आहेत त्यांनी थोडा विचार करावं ते युपीचे मुख्यमंत्री नाहीत ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. जो महाराष्ट्र सुधारणावादी आहे, सेक्युलर आहे, पुरोगामी विचारांचा आहे,” असे ते म्हणाले.
पुढे ते म्हणाले, “गेल्या १०-१२ वर्षांपासून जे हिंदू-मुस्लिम राजकारण सुरु आहे त्यातून कोणाला नोकरी मिळत नाही किंवा कोणाची परीक्षा चांगली होत नाही. त्यामुळे सरकारला आपला फोकस आणि प्राधान्यक्रम बदलावा लागेल. मला तुम्ही पाकिस्तानी म्हणता, तुम्ही काही पत्रकारांना पाकिस्तानी म्हणता, तुम्ही विरोधकांना पाकिस्तानी म्हणता मग भारतीय कोण आहे? फक्त भाजपवाले आणि आयटी सेलवालेच भारतीय आहेत का?” असा सवाल त्यांनी केला.
ते पुढे म्हणाले, “आमची प्रेरणा महात्मा गांधी, आंबेडकर, नेहरू, भगतसिंग आहेत. विचारधारा कोणत्या एका पक्षाची नाही. फक्त पाच वर्षातून एकदा मत देणं म्हणजे पॉलिटिक्स नाही. पॉलिटिक्स म्हणजे तुम्हाला पाचहि वर्ष ज्यांना मत दिलं त्यांना प्रश्न विचारणं पॉलिटिक्स असतं. त्यांनी राजकारणाला केवळ निवडणुकीपुरते मर्यादित ठेवले आहे, पण आम्ही ‘मुद्द्याचं राजकारण’ करत आहोत” असे ते म्हणाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘आपण सर्वानीच पाहिलं, जंतर मंतरला बघितलं कि ज्याप्रकारे तिथे नारेबाजी झाली, भाषणे झाली, व्यक्तव्ये झाली त्यातून एक गोष्ट लक्षात आली कि भारताच्या युवांची अभिव्यक्ती नाही तर अराजकता पसरवण्याच्या मानसिकतेची अभिव्यक्ती आपल्याला पाहायला मिळाली. विशेषतः डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं संविधान हातात घ्यायचं आणि त्या संविधानाने तयार केलेल्या संस्था नाकारायच्या. त्या संविधानाने तयार केलेली व्यवस्था उखडून टाकायचं बोलायचं,” असे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले, “संविधान केवळ पुस्तक नाही, त्यातील प्रत्येक आर्टिकलमध्ये या देशाच्या लोकशाहीची तत्व आहेत. ती तत्व नाकारणारे पुस्तक घेऊन फिरले तरी ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विरोधी आहेत. ते संविधान विरोधी आहेत. त्यामुळे मला असं वाटत कि, आज अभिव्यक्तीने त्यांचा खरा अराजकतेचा चेहरा आणि मनसुबे उघडे झाले आहेत, त्यांना कुठलंही समर्थन मिळालेलं नाही,” अश्या शब्दांत त्यांनी या आंदोलनावर टीका केली.