
कोलकात्याच्या निर्णयावर अबू आझमींचा भाजपवर घणाघाती हल्ला (Photo Credit- X)
“रस्त्यावर नमाज पठण करणे हा शौक नाही, तर मजबुरी” अबू आझमी यांनी मुस्लिम समुदायाला प्रत्येक लहान-मोठ्या मुद्द्यावरून जाणीवपूर्वक लक्ष्य केले जात असल्याची खंत व्यक्त केली. रस्त्यावरील नमाज पठणाचे समर्थन करताना त्यांनी तांत्रिक बाजू मांडली. आझमी म्हणाले, “जेव्हा मशिदींमध्ये जागा अपुरी पडते आणि भाविकांची गर्दी वाढते, तेव्हा लोक नाईलाजास्तव काही काळासाठी बाहेर नमाज पडतात. जगभरात हे चित्र पाहायला मिळते. हा कोणाचा शौक नाही, तर जागेच्या तीव्र टंचाईमुळे निर्माण झालेली मजबुरी आहे.” नमाज केवळ काही मिनिटांची असते, मात्र काही लोक याकडे फार मोठा अडथळा असल्यासारखे पाहत आहेत, असेही ते पुढे म्हणाले.
भाजप आणि ध्रुवीकरणाच्या राजकारणावर थेट प्रहार आपल्या वक्तव्यात आझमी यांनी केवळ एका राज्याचा उल्लेख न करता संपूर्ण देशातील राजकीय परिस्थितीवर चिंता व्यक्त केली. भारतीय जनता पक्ष (BJP) शासित राज्यांमध्ये अल्पसंख्याकांच्या धार्मिक स्वातंत्र्यावर गदा आणणारे वातावरण जाणीवपूर्वक तयार केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
“आज संपूर्ण देशात एका विचारपूर्वक आखलेल्या रणनीतीनुसार मशिदींच्या बाहेर इबादत करण्यास बंदी घातली जात आहे. हा थेट मुस्लिम समाजाला मुख्य प्रवाहातून बाजूला करण्याचा प्रयत्न आहे,” असे आझमी म्हणाले. त्यांच्या मते, अशा प्रकारच्या निर्बंधांमुळे विविध समुदायांमध्ये दरी निर्माण होते.
राजकीय वर्तुळात वादाला तोंड; सोशल मीडियावर चर्चा रंगली अबू आझमी यांच्या या वादग्रस्त विधानानंतर राजकीय वर्तुळात आणि सोशल मीडियावर नवीन वादाला तोंड फुटले आहे. एका बाजूने सार्वजनिक सुव्यवस्था, शांतता आणि वाहतुकीची कोंडी लक्षात घेता प्रशासनाचा निर्णय योग्य असल्याचे म्हटले जात आहे. तर दुसऱ्या बाजूला, आझमी यांच्या समर्थकांनी याला धार्मिक भेदभाव मानले आहे. “भारतासारख्या लोकशाही देशात प्रत्येकाला आपापल्या श्रद्धेनुसार आचरण करण्याचा अधिकार आहे. प्रशासनाने बंदी घालण्याऐवजी पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून देण्यावर भर दिला पाहिजे,” असे सांगत आझमी यांनी आपल्या भूमिकेचा पुनरुच्चार केला.