"महाराष्ट्रात मुस्लिमांना रस्त्यावरून चालणेही कठीण" (Photo Credit- X)
समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांनी विधानसभेत एक वादग्रस्त वक्तव्य केले. त्यांनी म्हटले की, राज्यात मुस्लिम असुरक्षित आहेत. आझमी पुढे म्हणाले की, आज मुस्लिमांना रस्त्यावरून चालणेही कठीण झाले आहे. त्यांनी असेही म्हटले की, दाढी, कुर्ता आणि टोपी घातलेल्या व्यक्तीवर कोणी कधी हल्ला करेल याचा अंदाज लावणे अशक्य आहे.
अबू आझमी पुढे म्हणाले की, सत्तेसाठी द्वेष भडकवण्याचे परिणाम महाराष्ट्र भोगत आहे. पुण्यात इफ्तारसाठी जमलेल्यांवर झालेला धारदार शस्त्रांचा हल्ला, अकोल्यात केवळ कोणाकडे तरी पाहिल्यामुळे १७ वर्षीय माविशची झालेली हत्या, आणि नांदेडमध्ये ईदच्या दिवशी झालेला संशयास्पद मोटारसायकल बॉम्बस्फोट या सर्व घटना आपल्या समाजाला आणि देशाला विखंडित करणाऱ्या वाढत्या द्वेषाचे दर्शन घडवतात.
सपा आमदार आझमी पुढे म्हणाले की, सहिष्णुता कमी होत असून कायदा आणि सुव्यवस्था मोठ्या प्रमाणात खालावली आहे. त्यांनी मागणी केली की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी द्वेषपूर्ण गुन्ह्यांविरोधात लवकरात लवकर कठोर कारवाई करावी. मुस्लिमांना रस्त्यावर चालणेही कठीण झाले आहे. ते म्हणाले की, प्रत्येक नागरिकाची सुरक्षा सुनिश्चित करणे आणि कोणत्याही समाजाला भीतीच्या छायेत जगण्यास भाग पाडले जाऊ नये, ही सरकारची जबाबदारी आहे.
अबू आझमी यांनी सांगितले की, भारतात आजवर अनेक दंगली आणि ऐतिहासिक घटना घडल्या आहेत, ज्यावर चित्रपट बनवता आले असते. मात्र, ‘धुरंधर 2’ची निर्मिती केवळ मुस्लिमांची बदनामी करण्यासाठी करण्यात आली आहे. “हा चित्रपट केवळ एक षडयंत्र आहे. ज्या प्रकारे यामध्ये मुस्लिम समुदायाचे चित्रण करण्यात आले आहे, त्यावरून स्पष्ट होते की, समाजात फूट पाडण्याचा हा सुनियोजित प्रयत्न आहे,” असा आरोप आझमी यांनी केला.






