पुण्याहून नागपूरला जाताना अपघात (संग्रहित फोटो)
नागपूर : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावरून दररोज हजारो वाहने ये-जा करतात. जेव्हापासून हा मार्ग सुरु झाला आहे तेव्हापासून अनेक अपघात झाल्याचे पाहिला मिळाले. त्यातच आता पुणे येथून नागपूरकडे परत येत असताना समृद्धी महामार्गावर भीषण कार अपघात झाला. यामध्ये एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला. कार चालक चेतन हेलगे (वय २५) हा गंभीर जखमी असून, त्याच्यावर वाशीम येथील रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
जयस्वाल कुटुंबातील सर्व मृत नागपूर जिल्ह्यातील उमरेड येथील रहिवासी आहेत. हा भीषण अपघात गुरूवारी सांयकाळी सातच्या दरम्यान झाला. पुणे येथे एका कौटुंबिक कार्यक्रमासाठी ते गेले होते. गुरुवारी रात्री वाशिम परिसरात त्यांची भरधाव कार अनियंत्रित झाल्याने हा भीषण अपघात घडला. दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृतांमध्ये वैदेही जयस्वाल (वय २५), माधुरी जयस्वाल (वय ५२), राधेश्याम जयस्वाल (वय ६७) आणि संगीता जयस्वाल (वय ५५) अशा चार जणांचा समावेश आहे.
कार डिव्हायडरला धडकून अपघात समृद्धी महामार्गावर वनोजा-कारंजादरम्यान पुण्याहून नागपूरच्या उमरेडला जात असलेल्या कारचे महामार्गावरील चॅनल क्र. २१५ वर नियंत्रण सुटल्यामुळे कार डिव्हायडरला धडकली आणि ही दुर्घटना घडली. या अपघातात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला. अशा या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. जखमींची प्रकृती गंभीर असल्यामुळे अधिक उपचारासाठी प्रयत्न सुरू आहेत.
यापूर्वीही अनेकदा झाले अपघात
दुसऱ्या एका घटनेत, समृद्धी महामार्गावरच भीषण अपघात झाला. नागपूरवरून पुण्याकडे जात असलेल्या ट्रॅव्हल्सच्या चालकाला समोरून येणाऱ्या ट्रेलरचा अंदाज आला नाही. त्यामुळे क्लिनरच्या बाजूने भरधाव ट्रॅव्हल्स आणि ट्रेलरची धडक झाली. या अपघातात 3 जण किरकोळ जखमी झाले. ही घटना शनिवारी मध्यरात्री सव्वा तीनच्या सुमारास समृद्धी महामार्गावरील दुसर बीडजवळ घडली. या अपघातात कल्पना रमेश नासरे (वय 30, रा. नागपूर) यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली.