आता राज्यातील महामार्गावर महिलांसाठी असणार स्वतंत्र स्वच्छतागृह
शहरामध्ये मुख्य बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कापड बाजार, गंज बाजार, चितळे रोड परिसरासह अनेक भागांत महिलांसाठी एकही सार्वजनिक स्वच्छतागृह नाही. त्यामुळे बाजारात येणाऱ्या महिलांची कुचंबणा होत असते. याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावरही होत आहे. कापड बाजार वा बाजारपेठेत काही खरेदी करण्यासाठी आलेल्या महिलांना अनेक समस्यांना सामोरे जावं लागतं. तेथील काही दुकानांतून स्वच्छतागृहाची सुविधा आहे. पण सार्वजनिक स्तरावर महिलांसाठीची अशी स्वतंत्र सुविधा नाही. याचपार्श्वभूमीवर आता महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
चौथ्या महिला धोरणात महिलांसाठी आरोग्य आणि स्वच्छता सुविधा उपलब्ध करण्याबाबत अधिक प्राधान्य देण्यात येणार आहे. यानुसार महामार्गावर प्रत्येक २५ किलो मीटर अंतरावर सुसज्ज स्वच्छतागृह बांधण्यात येणार आहेत. या स्वच्छतागृहांचे देखभाल व व्यवस्थापन स्थानिक महिला बचतगटामार्फत करण्यात येईल. याशिवाय महामार्गावर बचतगटांना उत्पादनांची विक्री व्यवस्था करण्याचे नियोजन करण्यात येणार असल्याची माहिती महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.
महिला धोरणात महिलांच्या सुरक्षेला अधिक प्राधान्य देताना राज्यातील महामार्गावरील स्वच्छतागृहांची दुरावस्था दूर करण्याबाबतही अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले होते. यात प्रामुख्याने राज्यातील राज्य महामार्ग, राष्ट्रीय महामार्ग, समृद्धी महामार्गासह द्रुतगती महामार्गांवर प्रत्येक २५ किलोमीटर अंतरावर महिलांसाठी स्वच्छतागृह उभारण्याचे निश्चित करण्यात आले होते. महिला व बाल विकास विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या समन्वयातून हा प्रकल्प राबविला जाणार असल्याची माहिती मंत्री तटकरे यांनी दिली. स्वच्छतागृहांचे बांधकाम सार्वजनिक बांधकाम विभाग करणार असून, जन सुविधा केंद्राचे व्यवस्थापन माविम स्थापित बचत गटांमार्फत करण्यात येणार आहे.
महिलांना आर्थिक साक्षरतेच्या सहाय्याने स्वावलंबी करण्यासाठी महिला व बाल विकास विभाग आणि महिला आर्थिक विकास महामंडळ सकारात्मक उपक्रम राबवित आहे. मविमने सशक्ती कॉन्क्लेव्हच्या (परिसंवाद) माध्यमातून 55,000 हून अधिक महिलांना सक्षम बनवण्यासाठी उद्योग उभारणीत सहकार्य केल्याचा आनंद महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी व्यक्त केला. मास्टरकार्डच्या पाठिंब्याने आणि लर्निंग लिंक्स फाउंडेशन (LLF) द्वारे राबविण्यात आलेल्या सशक्ती कॉन्क्लेव्ह 2024-25 चे आयोजन नुकतेच नवी मुंबई येथे करण्यात आले होते.
या परिसंवादात महिलांशी संवाद साधतांना मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले की, राज्यातील महिलांना शिक्षणाबरोबरच आर्थिक आत्मनिर्भर होण्यासाठी विविध योजनांच्या माध्यमातून सातत्याने प्रोत्साहित करण्यात येत आहेत. यासाठी राज्यातील जास्तीत जास्त महिलांना आर्थिक साक्षर करणे हे महत्वाचे उद्दिष्ट विभागाने डोळ्यासमोर ठेवले आहे. बचतगटांनी छोटे-मोठे उद्योग व्यवसायाबरोबरच मोठे व्यवसाय सुरू करण्यासाठी सुद्धा प्रयत्न करणे आवश्यक आहे. यासाठी शासनस्तरावर महिलांना सर्वोतोपरी मदत करण्यात येत आहेत. मोबाईलमुळे मोठी क्रांती झालेली आपल्याला पहावयास मिळते. मोबाईलसारख्या गॅझेटच्या माध्यमातून आर्थिक देवाण घेवाण करतांना महिलांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. अशा वेळी महिलांना अशा परिसंवादाच्या माध्यमातून आर्थिक देवाण-घेवाण करतांना कशा प्रकारे आपण खबरदारी घेतली पाहिजे याविषयी परिसंवादाच्या माध्यमातून मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
देशात महिलांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. महिलांनी छोटे-मोठे उद्योग व्यवसाय सुरू करून आर्थिक सक्षम होण्याचा निर्धार. यामुळे कुंटुबाला आर्थिक हातभार तर लागेलच परंतू निर्णय घेण्याचे स्वातंत्र देखील मिळणार आहे. महिलांनी सूरू केलेल्या उद्योग व्यसायामुळे देशाचे दरडोई उत्पन्न वाढण्यास मदत होणार आहे. यासाठी केंद्र आणि राज्य शासन सदैव महिलांच्या पाठीशी उभे असल्याचे खासदार नारायण राणे यांनी सांगितले.
व्यवस्थापकीय संचालक वर्षा लड्डा म्हणाल्या की, माविम आणि लर्निंग लिंक्स फाउंडेशन (LLF) सारख्या स्वयंसेवी संस्थांमधील सहकार्यामुळे स्वयं-मदत गट (SHG) सक्षम होण्यासाठी मदत होत आहे. 2000 महिलांना एल एल एफ ने प्रशिक्षण देऊन, 200 महिलांना एलएलएफ-मास्टरकार्ड भागीदारी अंतर्गत अनुदान प्रदान केले. यामुळे यशस्वीरित्या त्यांचे व्यवसाय सुरू आहेत. हे खरोखरच प्रशंसनीय आहे.






