
पाणीटंचाईवर प्रशासन सतर्क! पाझर तलाव, बंधाऱ्यांच्या नियमित पाहणीसाठी विशेष पथकांची नियुक्ती
संभाव्य ‘एल निनो’ परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आगामी काळात पर्जन्यमानात घट होऊन पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने आतापासूनच प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर दिला आहे. लातूर जिल्ह्यातील पिज्याच्या पाण्यासह शेती व अन्य आवश्यक बाबींसाठी उपलब्ध जलसाठ्याचे योग्य नियोजन आणि प्रभावी नियंत्रण करण्यासाठी प्रत्येक पाझर तलाव व बंधाऱ्याची नियमित पाहणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी दिले आहेत. यासाठी तहसीलस्तरावर प्रत्येक प्रकल्पासाठी विशेष पथक नियुक्त करण्यात येणार आहे. संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त, छत्रपती संभाजीनगर यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली. या बैठकीत जिल्ह्यातील प्रत्येक तहसील कार्यालयाच्या स्तरावर प्रत्येक पाझर तलाव व बंधाऱ्यासाठी विशेष पथक नियुक्त करण्याच्या सूचना देण्यात आल्या.(फोटो सौजन्य – AI)
क्रांतिकारी शेतकरी संघटना आक्रमक, लातूर-लामजना महामार्गावर तीव्र आंदोलन; नेमकं मागण्या काय?
पथकांनी संबंधित प्रकल्पांना वेळोवेळी प्रत्यक्ष भेट देऊन जलसाठा आणि पाणी उपलब्धतेवर लक्ष ठेवायचे आहे. तहसीलदार, नायब तहसीलदार अथवा विस्तार अधिकारी, पाणीपुरवठा विभागातील अभियंता, उपविभागीय किंवा कनिष्ठ अभियंता, जलसंपदा अथवा पाटबंधारे विभागातील संबंधित अधिकारी, जिल्हा परिषद विभागातील अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, महसूल सेवक, ग्रामपंचायत अधिकारी, ग्रामपंचायत पाणीपुरवठा कर्मचारी, सहायक कृषी अधिकारी, पोलीस बीट अंमलदार, पोलीस पाटील तसेच विद्युत विभागातील कर्मचारी यांचा या पथकांमध्ये समावेश करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. प्रत्येक अधिकारी-कर्मचाऱ्याचे नाव, पदनाम, कार्यालय आणि मोबाईल क्रमांक आदेशात नमूद करण्यासही सांगण्यात आले आहे.
पथकांकडून प्रकल्पातील सद्यस्थितीतील जलसाठा आणि उपलब्ध पाण्याची स्थिती तपासली जाणार आहे. पिण्याच्या पाण्यासाठी राखीव ठेवलेल्या प्रकल्पातील जलसाठ्याचा अनधिकृत वापर होत नाही ना, यावरही लक्ष ठेवण्यात येणार आहे, नदी, नाला, तलाव किंवा बंधाऱ्यातील पाणी अनधिकृत पंप, मोटार, पाइपलाइन अथवा अन्य साधनांद्वारे उपसले जात असल्याचे निदर्शनास आल्यास विद्युत पुरवठा खंडित करण्यासह संबंधित विभागांच्या समन्वयातून तातडीची प्रतिबंधात्मक कारवाई करावी.
तसेच संभाव्य पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता असलेल्या गावांची पूर्वसूचना आणि पूर्वतयारीच्या दृष्टीने माहिती संकलित करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. कार्यक्षेत्रातील पाणीटंचाईसंदर्भात प्राप्त होणाऱ्या तक्रारींची प्रत्यक्ष पाहणी करून आवश्यक कार्यवाही करण्याची जबाबदारी या पथकांवर असेल. विशेष भरारी पथकाने प्रकल्पनिहाय दैनंदिन क्षेत्रभेटी देऊन प्रत्येक भेटीची स्वतंत्र नोंदवही ठेवावी. त्यात भेटीचा दिनांक, प्रकल्पाचे नाव, जलक्षमता, उपलब्ध जलसाठा, आढळलेल्या त्रुटी किंवा अनियमितता आणि केलेल्या कार्यवाहीची नोंद करावी, असे स्पष्ट करण्यात आले आहे. गंभीर स्वरूपाची बाब, अनधिकृत पाणी उपसा, पिण्याच्या पाण्याच्या स्रोताला धोका किंवा विद्युत पुरवठ्याशी संबंधित गंभीर बाब निदर्शनास आल्यास त्याची माहिती तातडीने तहसीलदारांना द्यावी.
लातूर मनपाच्या शाळेत ‘बोगस’ विद्यार्थी; अभिजीत दीपके यांचा गंभीर आरोप; सरकारकडे केली ‘ही’ मोठी मागणी
तहसीलदारांनी याबाबतचा पथकनिहाय दैनंदिन अहवाल ‘गुगल शीट्स’द्वारे जिल्हाधिकारी कार्यालयाला सादर करावा, असे निर्देश देण्यात आले आहेत. उपलब्ध जलसाठ्याचे योग्य नियोजन, संवर्धन आणि संभाव्य पाणीटंचाईवर प्रभावी नियंत्रण राखण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करावे. या कामात कोणतीही दिरंगाई अथवा टाळाटाळ होणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी पुजार यांनी दिले आहेत.