Photo : Pandharpur Officers
पंढरपूर : उजनी व वीर धरण पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी झाली. त्यामुळे भीमा नदीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आले आहे. वाढणारा पाण्याचा विसर्ग लक्षात घेता नदीकडच्या लोकांनी सतर्क राहावे म्हणून वारंवार सूचना देण्यात येत आहेत.
जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद व प्रांत अधिकारी सचिन इथापे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार सचिन लंगुटे, उपमुख्याधिकारी ऍड. सुनिल वाळूजकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांनी रविवारी दुपारी व्यास नारायण झोपडपट्टी व अंबाबाई पटांगण झोपडपट्टी येथे समक्ष पाहणी करून पूर परिस्थिती पाहता नागरिकांनी त्वरित आपले कुटुंब सुरक्षित राहण्याच्या दृष्टीने त्वरित स्थलांतरित करावे, अशा सूचना देण्यात आल्या.
नदीपात्रालगतच्या व्यास नारायण झोपडपट्टी व अंबाबाई पटांगण झोपडपट्टी येथील 35 झोपडपट्टी धारक यांना स्थलांतर करण्यासंबंधी नोटीस बजावण्यात आल्या आहेत. अंदाजे 75 कुटुंब राहू शकतील, अशा रायगड दिंडी समाज मठ उपजिल्हा रुग्णालयाच्या समोर येथे त्यांची राहण्याची व्यवस्था करण्यात आली. तसेच लोकमान्य विद्यालय जुन्या कोर्टासमोर येथेही व्यवस्था करण्यात आलेली आहे. स्पीकरद्वारे सर्वांना पुराची वाढती पातळी लक्षात घेता नागरिकांनी स्थलांतरित व्हावे म्हणूनही सूचना देण्यात आल्या आहेत
या ठिकाणी आपत्कालीन परिस्थिती उद्भवू नये म्हणून अग्निशमन वाहन, एक बोट ठेवण्यात आली. तसेच दोन ट्रॅक्टर, एक ट्रक यांच्या माध्यमातून नागरिकांचे सामान नेण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तसेच नगर परिषदेची अधिकारी व कर्मचाऱ्यांची सर्व टीम त्या ठिकाणी कार्यरत आहे.