
गोदड महाराज मंदिरात नवे विश्वस्त
संत सद्गुरू गोदड महाराज समाधी मंदिर येथील जुन्या विश्वस्त मंडळाला रद्द करून त्याच नोंदणी क्रमांकावर (१६/०३/१९५४, क्र. ए–३८१) नवीन विश्वस्त नेमण्यात आल्याने कर्जत शहरात मोठा वाद निर्माण झाला आहे. या निर्णयाच्या निषेधार्थ ग्रामस्थ, मानकरी आणि पुजाऱ्यांनी आज कर्जत शहर बंद ठेवत मंदिरासमोर धरणे आंदोलन केले. वारकरी संप्रदायातील भाविकांनीही भजन करून या आंदोलनाला पाठिंबा दिला.
या आंदोलनामुळे काही काळ शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. परिस्थिती लक्षात घेऊन प्रशासनाने मोठा पोलिस बंदोबस्त तैनात केला होता. आंदोलनादरम्यान काहीजण भावूक झाले आणि आपली भूमिका मांडताना अनेकांना अश्रू अनावर झाले. वक्त्यांनी धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली. तसेच हा विषय विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे आणि पालकमंत्री Radhakrishna Vikhe Patil यांच्या निदर्शनास आणून देणार असल्याचे सांगण्यात आले.
मंदिराचे पुजारी पंढरीनाथ काकडे यांनी सांगितले की, ग्रामदैवत संत सदगुरु गोदड महाराज यांच्या हस्तलिखित बक्षीसपत्रानुसार मंदिरावरील सर्व हक्क आणि वारसा महाराजांचे पट्टशिष्य वै. भिमाजीबुवा काकडे आणि वै. उमाबाई भिमाजीबुवा काकडे यांच्या वारसांकडे आहेत. त्याची अधिकृत नोंदणीही आहे.
त्या अनुषंगाने पूजा, धार्मिक सोहळे आणि मंदिराचा सर्व कारभार काकडे कुटुंबाच्या ट्रस्टच्या देखरेखीखालीच चालत आहे. यापूर्वी झालेल्या काही न्यायालयीन प्रकरणांमध्येही निकाल आमच्या बाजूने लागले आहेत. मात्र कोणतीही शहानिशा न करता आमच्या विरोधात कटकारस्थान करून जुन्याच नोंदणी क्रमांकावर नवीन ट्रस्टला मंजुरी देण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.
जिल्हा बँकेचे संचालक अंबादास पिसाळ यांनी सांगितले की, विभीषण खोसे आणि शशिकांत पाटील यांनी कोणालाही विश्वासात न घेता नवीन ट्रस्टी मंडळ तयार केले आहे. हे पूर्णपणे बेकायदेशीर असून ते तात्काळ रद्द करण्यात यावे.
ज्यांनी हा प्रकार केला त्यांनी स्वतःहून धर्मादाय आयुक्तांकडे लेखी अर्ज करून तो निर्णय मागे घ्यावा. तसेच धर्मादाय आयुक्त कार्यालयाने नियमांची योग्य अंमलबजावणी करणे अपेक्षित होते; मात्र या प्रकरणात तसे झालेले दिसत नसल्याचे त्यांनी सांगितले.
कर्जतचे माजी नगराध्यक्ष नामदेव राऊत यांनी सांगितले की, ग्रामदैवत गोदड महाराज यांची यात्रा, जन्मोत्सव, कुस्त्यांचे फड, पारंपरिक मानकरी, पुजारी, गावातील बारा वाड्यांतील मानकरी, भक्त आणि भजनी मंडळ यांना पूर्णपणे अंधारात ठेवण्यात आले आहे.
एका कुटुंबातील काही व्यक्ती वैयक्तिक स्वार्थासाठी मंदिराचा ताबा मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. कागदोपत्री ट्रस्ट उभा करून मंदिरावर नियंत्रण मिळवण्याचा डाव रचला जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
मंदिराचे मुख्य मानकरी बाळासाहेब पाटील यांनी सांगितले की, काही समाजकंटकांनी गोदड महाराज समाधी मंदिराच्या प्रकरणात राजकारण सुरू केले आहे. मंदिराचे मानकरी सर्व समाजातील विविध जातींमधील आहेत.
आमच्या पाटील कुटुंबाला वंशपरंपरेनुसार सेवेचा मान मिळाला आहे. मात्र खोटे पुरावे तयार करून नवीन ट्रस्ट स्थापन करण्यात आला आहे. धर्मादाय आयुक्तांनी या प्रकरणातील सर्व पुरावे तपासून योग्य निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली.