
'ती' एक चूक आणि संगमनेर पोलीस ठाण्यात शेकडो महिलांचे ठिय्या आंदोलन
संगमनेर बचत गटाची सीआरपी म्हणून कार्यरत असलेल्या महिलेला १० महिन्यांपासून मानधन मिळाले नाही. वरिष्ठांकडे मानधनाची मागणी केल्यानंतर तिच्याशी गैरवर्तन झाले. त्याची प्रशासनाने दखल घेतली नाही. पोलिसांनीही महिलेची तक्रार न घेतल्याने संतापलेल्या संगमनेरच्या शेकडो महिलांनी आज संगमनेर पोलिस ठाण्यात ठिय्या दिला.
सीआरपी महिलेला न्याय मिळावा यासाठी शहर व तालुक्यातील महिलांनी हे आंदोलन केले. पंचायत समितीच्या माध्यमातून चालवल्या जाणाऱ्या बचत गटांच्या नियंत्रणासाठी असलेल्या सीआरपीचे मागील १० महिन्यांपासून मानधन थकलेले आहे. काही महिलांचे मानधन दिले तर काहींचे मागे ठेवले.
पीडित महिला मानधन मागण्यासाठी गेल्यानंतर तिच्याशी वरिष्ठ अधिकाऱ्याने गैरवर्तन केले. तिने ही बाब पती यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते शरद नाना थोरात यांना सांगितली. काही युवक कार्यकत्यांनी संतापून संबंधित अधिकाऱ्याला चोप दिला. त्यानंतर पीडिता तक्रार देण्यासाठी पोलिस ठाण्यात गेली. रात्री दोन वाजेपर्यंत त्यांना तेथे थांबवूनही तक्रार नोंदवण्यात आली नाही. कोणाचा तरी फोन आल्याने तक्रार घेतली नसल्याचा आंदोलक महिलांचा आरोप आहे. तुम्ही सकाळी या असे सांगितल्याने पीडिता सकाळी नऊ वाजता पोलिस ठाण्यात जाऊनही तक्रार घेतली नाही. त्यामुळे संतापलेल्या शेकडो महिलांनी पोलिस ठाण्याकडे धाव घेत तेथे ठिय्या दिला. पीडितेला न्याय देण्याची मागणी केली. त्यांनाही पोलिसांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्यानंतर संतप्त महिलांनी घोषणाबाजी केली.
आशा, अंगणवाडी सेविकांसह विविध महिला कर्मचाऱ्यांना सतत त्रास दिला जातो. राजकीय कार्यक्रम त्यांना बंधनकारक केले जातात, महिलांकडून राजकीय अजेंडा राबवला जातो. यापूर्वी अशी परिस्थिती कधीही तालुक्यात नव्हती. संगमनेर तालुक्यात वाळू व अमली पदार्थाची तस्करी, गुंडागर्दी, मारामारी, हप्ते वसुली अशी परिस्थिती कधीही नव्हती, अशा तक्रारी आंदोलक महिलानी केल्या.
तालुक्यातील शेडगाव येथील महिला बचत गटातील समुदाय संसाधन व्यक्तीच्या मानधनावरून कर्मचारी नंदलाल कोकाटे यांना मारहाण केल्याच्या घटनेचाही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्येष्ठ कार्यकर्ते शरद थोरात, त्याची मुले यांच्यासह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. संबंधित महिलेविरूद्ध तक्रारी असल्याने त्यांना गटविकास अधिकाऱ्यांनी नोटीस दिली होती. त्याचे उत्तर न दिल्याने मानधन थांबविले होते. या कारणावरून संबंधित महिला, त्यांचे पती व शस्द थोरात व त्यांची मुले कार्यालयात आली आणि जाब विचारत मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.