
ब्रिटिशकालीन अकोट फाईल रेल्वे पूल झाला जीर्ण; आता लवकरच अत्याधुनिक नवीन पूल उभारणार
अकोला : अकोला शहरातील महत्त्वाचा आणि ब्रिटिशकालीन वारसा लाभलेला अकोट फाइल रेल्वे पूल जुना व जीर्ण झाल्याने त्याच्या जागी अत्याधुनिक नवीन पूल उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी खासदार अनुप धोत्रे यांनी सुमारे ९० कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणला आहे. खासदार धोत्रे आणि आमदार रणधीर सावरकर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे या कामाला गती मिळाली आहे.
या प्रकल्पासंदर्भात यापूर्वी महापालिकेचे पदाधिकारी आणि विविध विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची आढावा बैठक पार पडली होती. त्यानंतर आमदार सावरकर यांनी संबंधित अधिकारी व पदाधिकाऱ्यांसह प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन प्रस्तावित पुलाचे काम, वाहतूक व्यवस्था आणि पर्यायी मार्गाची पाहणी केली. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश देत सांगितले की, अकोट, अचलपूर, परतवाडा आणि तेल्हारा मार्गावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांना बांधकामाच्या काळात कोणताही त्रास होणार नाही, यासाठी प्रभावी वाहतूक नियोजन करूनच प्रत्यक्ष कामाला सुरुवात करावी.
वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पर्यायी मार्गांचे नियोजन
पुलाचे नकाशे व आवश्यक मंजुरीची प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करावी आणि रेल्वे प्रशासनाशी समन्वय साधून कामात कोणताही विलंब होणार नाही, याची दक्षता घ्यावी. बांधकामादरम्यान वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलिस प्रशासनाने पर्यायी मार्गांचे नियोजन करून प्रभावी वाहतूक व्यवस्था उभी करावी, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
Nashik Kumbh Mela : पंचवटीतील पेठ रस्ता रुंदीकरणाचा मार्ग मोकळा; सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीला वेग
या पाहणीवेळी महापौर शारदा खेडकर, महानगराध्यक्ष जयंत मसने, स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल, जिल्हाध्यक्ष संतोष शिवरकर, गिरीश जोशी, पवन महाले, माधव मानकर, शंकर वाकोडे यांच्यासह महापालिका व रेल्वे विभागाचे अभियंता प्रसाद पाटील, अभियंता योगेश इंगळे, अभियंता मृणालिनी ढंगारे, राजेश राठोड तसेच वाहतूक पोलिस विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
पाच वर्षांतच पुलाची वाट लागली
दररोज या मार्गाने प्रवास करणाऱ्या हजारो वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असून, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. वनदेवीनगर आणि विनोबा भावेनगरला जोडणारा हा पूल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते नागरिकांना समर्पित करण्यात आला होता. १२०० मीटर जोडरस्ता आणि २४.९६ कोटी रुपये खर्चुन उभारण्यात आलेला हा पूल जुलै २०२१ मध्ये पूर्ण झाला. मात्र, अवघ्या पाच वर्षांतच पुलावरील डांबरी व काँक्रीटचा थर उखडून लोखंडी सळ्या बाहेर आल्याने वाहनचालकांना मोठा धोका निर्माण झाला आहे.