'एका दिवसाच्या मुख्यमंत्र्यांवर चित्रपट काढावा अन् शरद पवारांनी...'; रावसाहेब दानवेंचा संजय राऊतांना टोला
जालना : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर टीकाटिप्पणी केली जात आहे. त्यातच माजी केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली. ‘संजय राऊत यांनी अडीच वर्षांच्या कार्यकाळात मंत्रालयात गेलेल्या ‘एका दिवसाच्या मुख्यमंत्र्यांवर’ चित्रपट काढावा आणि त्याचे दिग्दर्शन शरद पवार यांनी करावे, असा खोचक टोला रावसाहेब दानवे यांनी लगावला.
रावसाहेब दानवे यांनी विविध मुद्यांवर भाष्य केले. संजय राऊत यांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना दानवे म्हणाले, “यांची लोकप्रियता सोडा, यांच्यासोबत राहणे आणि फिरणेही लोक अपमान समजू लागले आहेत. सुनेत्रा पवार यांच्याविषयी अशा प्रकारचे वर्णन करणे ही काँग्रेसची सुरुवातीपासूनची संस्कृती आहे. ते कधीच कुणाबद्दल चांगले बोलत नाहीत”, अशी टीकाही त्यांनी केली.
दरम्यान, लोकसभेचे अधिवेशन हे जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी, त्यावर चर्चा करण्यासाठी आणि देशाच्या कारभाराशी संबंधित विषय हाताळण्यासाठी असते. मात्र, विरोधकांनी सात दिवसांत एकदाही चर्चेत भाग न घेता केवळ गोंधळ घातला, असा आरोप त्यांनी केला.
विरोधकांना पेपरफुटीशी काहीही देणे-घेणे नाही
विरोधकांना पेपरफुटीशी काहीही देणे-घेणे नाही. केवळ माध्यमांमध्ये वारंवार झळकण्यासाठी ते गोंधळ घालत आहेत, असेही ते म्हणाले. प्रसंग पडल्यास पंतप्रधान सभागृहात येतात; मात्र कोणताही पंतप्रधान संपूर्ण अधिवेशनभर सभागृहात बसून राहत नाही, असे दानवे यांनी सांगितले.
संजय राऊत यांच्या ‘लापता गृहमंत्री’ वक्तव्यावर म्हणाले…
संजय राऊत यांनी ‘लापता गृहमंत्री’ चित्रपट काढण्यापेक्षा अडीच वर्षांच्या कार्यकाळात मंत्रालयात गेलेल्या ‘एका दिवसाच्या मुख्यमंत्र्यांवर’ चित्रपट काढावा आणि त्याचे दिग्दर्शन शरद पवार यांनी करावे, असा खोचक टोला रावसाहेब दानवे यांनी लगावला.
…तर ठाकरे सरकारच्या कार्यकाळातील मंत्र्यांचीही पार्श्वभूमी तपासली पाहिजे
संजय राऊत यांना वृत्तवाहिन्या आणि वर्तमानपत्रांमध्ये झळकायचे असल्याने ते अशा प्रकारची विधाने करत असतात. देवेंद्र फडणवीस आणि सध्याच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांची पार्श्वभूमी तपासायची असेल, तर ठाकरे सरकारच्या अडीच वर्षांच्या कार्यकाळातील मंत्र्यांचीही पार्श्वभूमी तपासली पाहिजे, असे ते म्हणाले. खरे गुंड यांच्याच पक्षात आणि मंत्रिमंडळात होते, असा आरोप करत त्यांनी ठाकरे गटावर टीका केली.
सुनेत्रा पवार राजकारणात नव्या आहेत
एखाद्या राजकीय पक्षाच्या किंवा नेत्याच्या संदर्भात अशा प्रकारची टीका करणे योग्य नाही. सुनेत्रा पवार राजकारणात नव्या आहेत. अजित पवार सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर पक्षाने त्यांच्यावर जबाबदारी सोपवली. त्यामुळे त्यांच्या कामाचे मूल्यमापन करण्यासाठी वेळ द्यावा लागेल, असे दानवे म्हणाले. सुनेत्रा पवार यांच्याविषयी अशा प्रकारचे वर्णन करणे ही काँग्रेसची सुरुवातीपासूनची संस्कृती आहे. ते कधीच कुणाबद्दल चांगले बोलत नाहीत,” अशी टीकाही त्यांनी केली.
Parliament Monsoon Session : अमित शाह संसदेत का येत नाहीत? संसदेबाहेर ‘इंडिया’चा आक्रमक पवित्रा






