राज्यात भाजप (BJP) आणि शिवसेने(Shivsena)मध्ये टोकाचे राजकीय मतभेद निर्माण झाले आहेत. त्यातच नगरमध्ये भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील (Dr.Sujay Vikhe Patil) यांनी निर्धार केला आहे. इतरत्र परिस्थिती काहीही असली तरी नगर जिल्ह्यात आपण शिवसेनेसोबत राहणार आहोत. यामुळे भले पक्षाने आपल्यावर कारवाई केली तरी चालेल, असे ते म्हणाले. पारनेर (Parner) तालुक्यातील एका पदाधिकाऱ्याच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात विखे पाटील बोलत होते. यावेळी, शिवसेनेचे नेते विजय औटी (Vijay Auti) यांच्यासह भाजप, शिवसेना आणि इतर पक्षांचे पदाधिकारीही उपस्थित होते.
आपल्या भाषणात डॉ. विखे पाटील यांनी पारनेरचे राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांचे नाव न घेता टीका केल, तर नगर जिल्ह्यातील शिवसेनेचे कौतुक केले. डॉ. विखे पाटील म्हणाले, ‘मी खासदार म्हणून निवडून येण्यात ५० टक्के वाटा येथील शिवसेनेचा आहे, याची मला जाणीव आहे. त्यामुळेच गेल्या तीन वर्षांच्या काळात मी कधीही शिवसेनेच्या विरोधात बोललो नाही. मातोश्रीच्या विरोधात, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविरोधातही मी कधी बोललो नाही. माझे आजही हेच मत आहे की, राष्ट्रवादी काँग्रेस ही शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न करत आहे. राज्यसभेच्या निकालावरून ते पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. त्यामुळे ठाकरे यांनी वेळीच सावध व्हावे, हे मी सांगत आहे, असे विखे यांनी म्हटले आहे.
‘माझे काही कार्यकर्ते शिवसेनेत गेले. मला त्याची खंत वाटली नाही. केवळ पारनेर तालुकाच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यातच भाजप आणि पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता निवडणुकीत शिवसेनेशी एकनिष्ठ राहील. जेव्हा केव्हा शिवसेनेवर संकट येईल, तेव्हा मी या नगर जिल्ह्यातील शिवसैनिकांना एकटे सोडणार नाही. यामुळे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माझ्यावर कारवाई केली तरी चालेल. असे बोलण्याची हिंमत ठेवणारा मी भाजपचा एकमेव खासदार आहे. ही हिंमत माझ्यामध्ये आहे, कारण मी येथील राजकारण ओळखतो. येथे विचारांचा वारसा आहे. तो वारसा टिकविण्यासाठी असे निर्णय घेणे आवश्यक आहे. यावर शिवसेनेची काय भूमिका असेल, हे मला सांगता येणार नाही. मात्र, शिवसेनेने येथे घेतलेल्या प्रत्येक निर्णयाला माझा पाठिंबा असेल, असेही ते म्हणाले.
कधीही शिवसेनेवर टीका होणार नाही
गेल्या काळात पारनेर तालुक्यात शिवसेनेचा आमदार असताना मोठी कामे झाली. येणाऱ्या काळात कोणाची कशी आघाडी होणार हे माहिती नाही. मात्र, मी मात्र शिवसेनेसोबत राहण्यास ठाम आहे. यापुढे माझ्या तोंडून कधीही शिवसेनेवर टीका होणार नाही, याची ग्वाही देतो’, असंही डॉ. विखे पाटील म्हणाले.